जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन शांततापूर्वक आणि रूढी परंपरेनुसार पार पडले. आज गौरीचे आगमन होणार असून स्त्रिया उत्साहाने तयारी करत आहेत. गौरी गणपती विसर्जनासह सात, नऊ आणि दहा दिवसांच्या गणपती विसर्जन मिरवणूकीत बाप्पा आणि गणेशभक्तांवर पुष्पवृष्टी करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे यांनी दिली आहे. गणेश विसर्जन मिरवणूकीत गणेशभक्तांच्या लाडक्या बाप्पावर पुष्पवृष्टी होणार आहे.
मागील दोन वर्षे कोरोना संकट आणि सणांवर असलेले निर्बंध यामुळे दोन वर्षे गणेशभक्तांना आपल्या आनंदाला मुरड घालून गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. मात्र यावर्षी एकतर कोरोनाचे संकट बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने आणि निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची शासनाने परवानगी दिल्याने भाविकांच्या उत्साहाला पारावार उरलेला नाही. लाखोंच्या संख्येत अनेक ठिकाणाहून चाकरमानी कोकणात आपापल्या गावी दाखल झाले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांच्या सोयी सुविधांकडे विशेष लक्ष पुरवत, नगर परिषद प्रशासनाकडूनही शहरात सर्वोतोपरी गणेशोत्सवाची तयारी करण्यात आली आहे.
माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे यांनी यावर्षी राजापूर शहरात गणेश विसर्जन मिरवणूकीत बाप्पावर पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचे सांगितले. राजापूर शहरातील गौरी बरोबर विसर्जन होणारे गणपती व त्यानंतर सात दिवस, नऊ दिवस व अनंतचतुर्दशीला होणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणूकीत मिरवणूकी मार्गावर व विसर्जन घाटावर गणपती बाप्पा व गणेशभक्तांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचे अॅड. खलिफे यांनी सांगितले. गणपती विसर्जन घाटाची देखील उत्कृष्ट रित्या साफसफाई करून घेऊन भाविकांना काहीही त्रास होणार नाही याची विशेष काळजी पालिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.