काल राजापूरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत एक घटना घडली आहे. रिफायनरीला विरोध करणाऱ्या एका कार्यकर्त्याने नाना पटोले आणि पोलिसांसमोरच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पोलिसांसमोरच जाळून मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
त्याने दिलेल्या धमकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. एखाद्या मंत्र्याला अशी खुलेआम धमकी देण्याची ही घटना पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस अधिक्षक मोहनकुमार गर्ग यांनी उदय सामंत यांच्याशी याविषयी चर्चा केली आणि पुढील चौकशीची ग्वाही दिली. धमकी दिलेल्या या नेत्याचं नाव जोशी असल्याचं सांगितलं जात आहे.
रिफायनरी समर्थक आणि विरोधक यांनी राजापुरात नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी आपली भूमिका मांडत असताना रिफायनरी विरोधकांचा संताप अनावर झाला. त्यानंतर त्यातल्या जोशी यांनी उदय सामंत यांबद्दल अर्वाच्य भाषा वापरून त्यांना जाळून मारण्याची धमकी दिली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पोलिसही उपस्थित होते.
रिफायनरीच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलनही पुकारलं होतं. तसंच, गणेशोत्सवात प्रकल्पाविरोधात बॅनरबाजी करुन देखील लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता हा वाद थेट राजकीय नेत्यांपर्यंत येऊन ठेपला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना रिफायनरी विरोधात असणाऱ्या आंदोलकांनी धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. नाणारनंतर आता रत्नागिरीतील बारसू-सोलगाव रिफायनरीवरून स्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. बारसु-सोलगाव रिफायनरीसंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी विरोधाची भूमिका तीव्र केली असून, ही रिफायनरी जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा रिफायनरी विरोधकांचा आरोप आहे.