रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमारेषेवरील खारेपाटण भागातून वाहत येणार्या नद्या तालुक्यातील सागवे येथे अरबी समुद्राला भेटत असून त्याच ठिकाणी या नदीचे मुख आहे. खारेपाटणमार्गे नद्या वाहत येताना पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळाचे देखील वहन होतो. मात्र, त्याचवेळी समुद्रातून येणार्या भरतीच्या पाण्यामुळे हा गाळ समुद्राच्या तळाशी जाण्याऐवजी किनार्यावरच साचून राहतो. आणि गाळ साचून साचून त्या जागेवर आता खडक निर्माण होऊन, गाळ संचाची ही परिस्थिती वर्षानुवर्षे तशीच असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळाचा साठा झाला आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागाला विशाल समुद्र किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीवर साखरीनाटे, नाणार, दांडेअणसुरे, सागवे, अणुसरे, कातळी इत्यादी भाग येत असून या समुद्र किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात परंपरागत मच्छी व्यवसाय सुरु आहे. दरदिवशी लाखो रुपयांची उलाढाल करणारा हा व्यवसाय या भागातील सुमारे १० हजाराहून अधिक लोकांसाठी रोजगाराचे साधन बनले आहे.
ब्रिटिशांच्या काळामध्ये राजापुरातून चालणाऱ्या व्यापाराच्या काळामध्ये तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील जैतापूर खाडीतून मोठमोठी जहाजे आणि गलबते राजापूर बंदरामध्ये येत असत. त्या काळामध्ये जैतापूर खाडी परिसराला विशेष महत्व होते. त्या वेळी जैतापूर खाडीचा भाग खूप खोल होता; मात्र, कालांतराने या खाडीपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचा संचय झाला.
अशा स्थितीमध्ये गाळाने भरलेल्या या खाडीतून जहाजांची असलेली ये-जा सद्यःस्थितीमध्ये बंद झाली आहे. त्यामुळे ब्रिटिशकाळामध्ये नावारूपास आलेली ही खाडी सध्या केवळ नावापुरती राहिली आहे. या गाळामुळे मच्छीमारी करून परतलेल्या होड्या उभ्या करणे वा मच्छीमारीसाठी पुन्हा समुद्रात ढकलणे मुश्किल बनत चालले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळाच्या उपशाची अद्याप वाट पाहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.