राजापूरवासियांनी नाम फाउंडेशन यांचा पुढाकार आणि महसूल विभाग, नगर पालिका यांच्या सहकार्याने शहरातील अर्जुना व कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्याचा निर्धार नुकताच केला. आमदार राजन साळवी यांनी या गाळ उपशासाठी जिल्हा नियोजनमधून सुमारे २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. या निधी उपलब्धतेचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजापूर शहराला भेडसावणाऱ्या पुराची समस्या आणि पाणीटंचाई यावर मात करण्यासाठी शहरातील अर्जुना व कोदवली नदीपात्रातील गाळ उपसा करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी नाम फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि महसूल विभाग, नगर पालिका यांच्या सहकार्याने लोकसहभागातून नद्यांमधील गाळाचा उपसा करण्यात येणार आहे. या गाळ उपशासाठी लागणारी यंत्रसामुग्री नाम फाउंडेशन उपलब्ध करून देणार असून डिझेल आणि अन्य खर्चासाठी लागणारा निधी लोकसहभागातून उभारण्याचा निर्धार राजापूरवासीयांच्या झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आला.
निधी उभारणीची सुरुवात झाली असून, लोकांनी उत्स्फूर्तपणे निधी देण्याच्या घोषणाही केल्या आहेत. त्यातून निधीची उभारणी होण्याला सुरवात झाली आहे. या उपशाच्या डिझेल खर्चासाठी पालकमंत्री सामंत यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून २५ लाखाचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार साळवी यांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच राजापूर मधील नद्या लवकरच गाळमुक्त होणार असल्याने, आणि प्रत्येक पावसाळ्यातील पुराचे संकट कायमचे दूर होणार असल्याने स्थानिकांना सुद्धा दिलासा मिळाला आहे.