खेड जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले असून शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी आमदार भास्कर जाधव याच्या मतदारसंघात आक्रमक पवित्रा घेत जोरदार फटकेबाजी केली. खेड तालुका तसेच गुहागर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या धामणंद विभागातील पंधरा गावांमध्ये झालेल्या जाहीर सभेमुळे निवडणूक रणधुमाळींला चांगलाच वेग आला आहे. या सभांमध्ये बोलताना रामदास कदम यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर थेट आणि खोचक शब्दांत टीका केली. भास्कर जाधव हे फक्त सगळ्यांच्या नकला करणारे नेते आहेत. नकला करून राजकारण करता येत नाही. त्यांनी आधी चांगल्या डॉक्टरकडे उपचार घ्यावेत, असा घणाघात त्यांनी केला. आमदार निधीच्या मुद्यावरूनही कदम यांनी जाधवांवर गंभीर आरोप केला. आमदार निधी ५ कोटींचा असताना १५ कोटींच्या कामांची पत्रे वाटली जात आहेत.
ही जनतेची सरळ सरळ फसवणूक आहे, असा आरोप त्यांनी सभेत केला. यावेळी रामदास कदम पुढे म्हणाले, कोकणातील जनता आता सगळे पाहते आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहे. धामणंद विभागातील पंधरा गावांत झालेल्या या जोरदार सभांना मोठी गर्दी झाली होती. रामदास कदम यांच्या आक्रमक भाषणामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून विरोधकांच्या गोटात मात्र अस्वस्थता ‘पसरल्याचे चित्र आहे. या सभांमुळे खेड आणि गुहागर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे वातावरण अधिकच तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या विभागांमध्ये जिल्हा परिषद गटासाठी सुनील मोरे तर पंचायत समिती गणासाठी रेवती’ पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन शिवसेना नेते राम दास भाई कदम यांनी केली

