आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांच्यावतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्या पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच कोकणातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैभव खेडकर यांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेनेचे नेते रामदास कदम, राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी आमदार संजय कदम आणि मनसेचे नेते वैभव खेडकर एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे या कार्यक्रमात चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगली होती. या कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी वैभव खेडकर यांचा मी राजकीय गुरु असल्याचे सांगत त्यांना राज ठाकरे यांच्याकडे मीच घेऊन गेलो होतो, अशीदेखील पुष्टी जोडली. इतकेच नाही तर पुढे काय करायचे? हे वैभव खेडकर यांना माहिती आहे. समझनेवाले को इशारा काफी हैं, असे म्हणत त्यांनी थेट त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली.
या कार्यक्रमात सर्वच नेत्यांनी चांगलीच राजकीय टोलेबाजी केली. संजय कदम आणि रामदास कदम यांच्यातील वाद संपुष्टात आल्याने माझी अडचण दूर झाली असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र निर्माण सेना आणि महायुती एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता वैभव खेडकर यांच्या माध्यमातून कोकणातील राजकीय समीकरण बदलण्याची तयारी शिवसेना शिंदे गटाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. तसेच या सर्व घटना-घडामोडीमुळे सध्या कोकणात चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र याबाबत वैभव खेडेकर यांची प्रतिक्रीया कळू शकली नाही.