रत्नागिरी जिल्ह्याची काही प्रमाणात कायापालट करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयाच्या जुन्या इमारती पडून त्याजागी अद्ययावत इमारती बांधण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात १०० फूट उंच राष्ट्र ध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे. हा ध्वज स्तंभ रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव आहे. मात्र मागील काही महिने या ध्वज स्तंभावर भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा फडकत नसल्याचे लक्षात आले असून राष्ट्रीय ध्वज या १०० फुटी ध्वज स्तंभावरून काढून ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तरी गाव विकास समितीचे सरचिटणीस डॉ मंगेश कांगणे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकारी यांनी या ठिकाणी प्रजासत्ताक दिनापूर्वी राष्ट्रध्वज फडकवण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात गाव विकास समितीच्या वतीने नमूद करण्यात आले आहे की, आमची आपणास विनंती आहे, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना पूर्वी या १०० फुटी उंच ध्वज स्तंभावर आपला राष्ट्रध्वज फडकेल या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत. हा झेंडा फडकवल्यानंतर तो मधल्या काळात का काढून ठेवण्यात आला याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही गाव विकास समितीने केली आहे.
देशाचा तिरंगा हा संपूर्ण देशवासीयांचा सार्थ अभिमान आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे १०० फुटी उंच ध्वज स्तंभावर फडकणारा भारतीय तिरंगा पुन्हा दिमाखात फडकवला जावा अशी विनंती गाव विकास समितीचे डॉ.मंगेश कांगणे, सरचिटणीस श्यामकर्ण भोपळकर, जिल्हाध्यक्ष मुझम्मील काझी, जिल्हा संघटक सुकांत पाडाळकर, रत्नागिरी तालुका संघटक अमित गमरे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घुग, संगमेश्वर कार्याध्यक्ष प्रशांत घुग, तालुका उपाध्यक्ष दैवत पवार,विद्यार्थी संघटना यांनी ईमेलद्वारे पाठवलेल्या निवेदनातुन केली आहे.