रत्नागिरीमध्ये मासेमारी व्यवसायाला प्रारंभ ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झाला असून, मासेमारीच्या नवीन कायद्यानुसार सर्व नियम आणि दंड बदलले आहेत. रत्नागिरी तालुक्यात विविध प्रकारे मासेमारी केली जात असून, काही मच्छीमारांवर अन्याय होत असल्याचे म्हणणे काहींनी मांडले आहे.
रत्नागिरी तालुक्यात पर्ससीन व एलईडी लाईटच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या नौकांवर मच्छिमारांच्या नवीन सुधारित कायद्यानुसार कारवाई होत नसल्याचा आरोप पारंपरिक मच्छिमारांनी केला आहे. रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छिमार हक्क संघटनेने दिलेल्या निवेदनात सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या कामकाजा बाबत नाराजी व्यक्त केली आहे.
नवीन सुधारित कायदा हा आपला भाग वगळता दुसर्या ठिकाणी जाऊन मासेमारी करण्यात येऊ नये यासाठी करण्यात आला आहे. परंतु, अजूनही समुद्रात बेकायदेशीर रित्या मच्छीमारी करण्यात येत असून त्यांवर कडक कारवाई करण्यात येत नसल्याची खंत पारंपारिक मच्छीमार संघटनेने व्यक्त केली आहे. या कायद्याची अंमलबजावणी करून बेकायदेशीर मासेमारीला आळा घालण्यात यावा, अशी मागणी पारंपरिक मच्छिमारांनी केली आहे. मच्छिमारांच्या मागण्यामध्ये बेकायदेशीर पर्ससीन आणि एलईडी लाईटद्वारे होणारी मासेमारी पूर्णपणे बंद करण्यात यावी.
एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या नौकांमधील जनरेटर जप्त करून त्या नौकांवर दंडात्मक कारवाई करावी. नौकांवरील बेकायदेशीर जाळी जप्त करावी, अशी मागणी अध्यक्ष विशाल मूरकर यांनी केली आहे. यावेळी दत्तू कीर, रणजित भाटकर आणि इतर मच्छिमार उपोषणात सहभागी झाले होते. स्वातंत्र्यदिनी पारंपरिक मच्छिमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण छेडले. मागील वर्षी देखील जिल्ह्यातील अनेक मच्छीमारी संघटनांनी दीर्घ मुदतीच आंदोलन छेडून अख्खी रत्नागिरी दणाणून सोडली होती.

