रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्याने, संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन मायक्रो प्लॅनिंग करत आहे. ज्या गावांमध्ये आजूबाजूच्या वाड्यांमध्ये जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत, अशा भागाला प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून, तिथे योग्य ती जास्तीची खबरदारी घेऊन, तिथे जास्त उपाययोजना कशा राबविता येतील याकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जास्त संक्रमित असलेल्या ७ जिल्ह्यांचा आढावा घेतला असता, जिथे संक्रमितांची संख्या जास्त आहे किंवा वाढते आहे अशा जिल्ह्यातील कोरोनावरील निर्बंध शिथिल करण्याची घाई करू नका अशा जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ऑनलाईन आरोग्य यंत्रणेसह आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यामध्ये वाढत्या संसर्गितांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
ग्रामीण भागातील संक्रमितांचे वाढते प्रमाण बघता, अनेक जण चाचणी करून घेण्यासाठी नकार देत आहेत, गाव किंवा वाडीमध्ये जिथे रुग्ण जास्त असतील, केवळ तेव्हढाच भाग प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून त्यावर कडक निर्बंध घातले जातील. आणि त्या भागावर विशेष लक्ष आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी ठेवतील. प्रसंगी टाळेबंदी सुद्धा करण्यात येईल.
रत्नागिरी तालुक्यामध्ये तहसीलदार, प्रांत, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रत्यक्ष ग्रामपंचायतीची पाहणी करत आहेत. तेथील परिस्थितीनुसार आयसोलेशन सेंटरसह चाचण्यांवर किती भार द्यायचा, याचे नियोजन करण्यात येणार आहे. रत्नागिरी मध्ये याची अंमलबजावणी व्हायला सुरुवात करण्यात आली आहे.