रत्नागिरी शहरी भागामध्ये झालेल्या पोषण आहारातील गोंधळामुळे ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशीच मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. एक नव्हे तर तब्बल तीन शाळांमधून असे पोषण आहारच्या दर्जा आणि अनियमिततेबाबत घटना घडल्याने शासनाने सुद्धा प्रत्यक्ष दाखल घेतली आहे.
सेंट्रल किचनच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या पोषण आहाराबाबत अनेक तक्रारी झाल्या. दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. तक्रारीनंतर या प्रकरणी पालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली आहे. अन्नाचे नमुने तपासणीसाठी ठाण्याला प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पोषण आहाराच्या निविदा प्रक्रियेचीही चौकशी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी करण्यात येणार आहे. दोन्ही ठेकेदार कंपन्यांना प्रत्येकी ५ हजार दंड ठोठावण्यात आला.
शहरातील शाळांना पोषण आहार वितरित करण्यासाठी जिल्ह्याबाहेरील तीन ठेकेदार कंपन्यांना ठेका देण्यात आला. या ठेक्याबाबतही काही प्रमाणात तक्रारी झाल्या. पोषण आहार वितरित करण्याच्या पहिल्यात दिवशी शिर्के प्रशालेतील मुलांना देण्यात आलेला निकृष्ठ दर्जाचा पोषण आहार, त्यामुळे मुलांनी हा पोषण आहार खाल्ला नाही. पर्यायी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली. लगेच दुसऱ्या दिवशी दामले विद्यालयात पोषण आहार एक तास उशिरा गेला. मुले भुकेने व्याकुळ झाल्याचे निरीक्षणात आले. एवढे होऊनही तिसऱ्या दिवशी पटवर्धन हायस्कूलमधील पोषण आहारात अळी मिळाल्याची लेखी तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे ठेकेदार कंपनी सुमार दर्जाचा पोषण आहार देऊन मुलांच्या आरोग्याशी खेळ करत आहे, अशी तक्रार केली. त्यांनी यापुढे संबंधित ठेकेदाराची तक्रार आल्यास ठेका रद्द करू, असे आश्वासन दिले. तर निविदा प्रक्रियेबाबत झालेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी लावू असे देखील आश्वासन दिले आहे. परंतू, त्यानंतर देखील पटवर्धन हायस्कूलमध्ये निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याची शिक्षकांनी तक्रार केली. यावरून पालिका मुख्याधिकाऱ्यांनी दोन्ही ठेकेदार कंपन्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई केली आहे.