भावा-बहिणीच्या सुंदर नात्याला अधिक घट्ट विणणारा सण म्हणजे रक्षाबंधन. याच नात्याची वीण घट्ट करण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने २६०० राख्या सीमेवरील जवान, पोलीस कर्मचारी आणि विशेष मुलांसाठी पाठवण्यात आल्या. या राख्या फाउंडेशनच्या पुढाकारातून शाळा, महाविद्यालये आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्रात बनवण्यात आल्या. प्रत्येक वर्षी आपल्या जीवाची पर्वा न करता सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येतो.
रत्नागिरी आणि मासार-गुजरात येथील फिनोलेक्स कौशल्य विकास केंद्र, विशेष मुलांचे कौशल्य विकास केंद्र, रत्नागिरीतील मुकुल माधव विद्यालय, येरवडा येथील मनोरुग्णालयातील रुग्णांनी आणि थॅलेसेमियाग्रस्त तरुणांनी राख्या बनवण्याच्या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला. प्रेम, काळजी आणि चांगल्या आरोग्यासाठी व सुरक्षेसाठी प्रार्थना करत आपल्या सीमेवरील सैनिक बांधवाना या राख्या पाठवण्यात आल्या.
या राख्या रत्नागिरी येथील तटरक्षक दल, पोलीस कर्मचारी, सियाचिनमधील जवान, औंध लष्कर केंद्रातील जवान, रत्नागिरीतील रिमांड होम, अपंग सैनिक कल्याण केंद्रातील जवान, उत्तर आणि पश्चिम भारताच्या सीमेवरील जवान, राजस्थानच्या सीमेवरील जवानाना पाठवल्या आहेत. तसेच मुकुल माधव विद्यालय रत्नागिरी आणि गुजरातच्या पद्रा गावातील शाळेमधील विद्यार्थी राख्यांची एकमेकांना देवाणघेवाण करणार आहेत.
मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी सांगितले कि, सीमेवर देशाच्या आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी तैनात भावांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी दरवर्षी फाउंडेशनकडून रक्षाबंधनाच्या निमित्ताने राख्या पाठवल्या जातात. त्याचप्रमाणे औंध लष्कर केंद्रात गतिमंद, अनाथ मुली, सेलेब्रल पाल्सी ग्रस्त, थॅलेसेमिया ग्रस्त आणि मुकुल माधव फाउंडेशनमधील महिला कर्मचारी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करणार आहेत.