जिल्ह्यात कोरोनाच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करून सुद्धा कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या आटोक्यात येत नाही आहे. तालुक्यामध्ये दिवसाला १०० ते १५० च्या वर संक्रमित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पॉझिटीव्हीटी दर उच्चांक गाठत आहे. रत्नागिरीमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन अनेक उपाययोजना राबवत असून देखील त्याला आवश्यक तेवढे यश मिळत नाही आहे.
जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर काही प्रमाणात कमी होताना दिसत असताना, तालुक्याचा दर मात्र अजूनही जास्तच आहे. लसीकरण मोहीम जास्तीत जास्त वेगवान पद्धतीने राबवून, चाचण्यामध्ये वाढ करण्यात येऊन सुद्धा तालुक्याचा पॉझिटीव्हीटी दर जैसे थे. त्यामुळे रत्त्नागिरी तालुका आरोग्य विभागाने चाचण्या वाढविण्यासाठी आठ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दररोज चार गावांमधील लोकांची सरसकट चाचणीचे नियोजन केले आहे.
मागील आठवड्यामध्ये रत्त्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सरसकट कोरोना चाचण्या करण्याचे आदेश दिले होते, आणि जि गावे त्याला विरोध करतील, अशा गावांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. रत्नागिरी सध्या कोरोना हॉटस्पॉट बनला असल्याने चाचण्या आणि लसीकरण याकडे पूर्ण लक्ष दिले जाणार आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी प्रत्येक तालुक्याला कोरोना चाचणी नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागातील केंद्रांमध्ये हातखंबा, चांदेराई, पावस आणि शहरी भाग केंद्रांमध्ये झाडगाव आणि कोकणनगर या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. तालुक्यामध्ये अजूनपर्यंत १३ हजार ५४४ संक्रमित रुग्ण सापडले असून ११ हजार ६३९ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.