केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेमध्ये अपमान केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी रत्नागिरीत बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. बसपाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. निषेध असो निषेध असो, अमित शहांचा निषेध असो! अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. यानंतर बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमुख व महत्वाच्या सहा मागण्यांचे राष्ट्रपती यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केले. सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, गेल्या ५००० वर्षांपासून आपल्या देशातील सुरु असलेल्या मनुवादी व्यवस्थेमुळे देशातील नागरिकांचे शोषण होत आहे. त्यामुळे मनुवादी व्यवस्थेने भारतीय जनतेला जिवंतपणातच नर्क भोग दिला. अश्या समाजात बाबासाहेब जन्माला आलेत. त्यांनी या मनुवादी व्यवस्थेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी काय परिश्रम घेतले.
काय काय हालअपेष्टा सहन केल्या हा इतिहास या देशातील सर्व नागरिकांना माहीत आहे आणि संविधानाच्या माध्यमातून या समाजाला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, दर्जाची व संधीची समानता राष्ट्राची एकता आणि एकात्मता, बंधुभाव निर्माण होईल असे संविधानात लिहीले आणि वर्ण व्यवस्था, जुलमी मनुवादी व्यवस्था मोडून या देशातील प्रत्येक नागरिकाला समान केले. तसेच भारतातील संपूर्ण नागरिकांना बाबासाहेबांनी मिळवून दिले. त्यामुळे आंबेडकर यांचं नाव घेणं हे पॅशन आहे अभिमान आहे; अतिशय आवड आहे; तीव्र भावना आहे. त्यामुळे सम्पूर्ण देशात त्यांचं आदराने नाव घेतात, त्यांचा सन्मान करतात. सम्पूर्ण देशातील नागरिकांच्या हृदयात बाबासाहेब आहेत.
हे सर्व माहीत असूनसुद्धा दि. १७/१२/२०२४ रोजी संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संसदेत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी जाणूनबुजून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे. त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे असे देखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या अपमानाबद्दल अमित शहांनी जाहीरपणे माफी मागावी तसेच त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. जर माफी मागितली नाही तर बसपाच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारादेखील देण्यात आला आहे.