कोकण आणि रिफायनरी प्रकल्पासाठीची जागा, यांचे कोडे दिवसेंदिवस गुंततच चालले आहे. रिफायनरी प्रकारणात कभी ख़ुशी कभी गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात रिफायनरी सारखे प्रकल्प नको, परप्रांतीयांनी केलेले व्यवहार, तडीपारीच्या नोटिसा, बेकायदेशीर सर्व्हे, स्थानिक ग्रामस्थ आणि आंदोलकांवर होणारी दडपशाही आदी घडलेले मुद्दे उचलून धरावेत तसेच या भागातील वारसास्थळ असलेली कातळशिल्प संरक्षण हा महत्वाचा मुद्दाही विधानसभेत घ्यावा.
शिवसेना पक्ष हा नेहमीच जनतेसोबत असतो म्हणून पक्षाची रिफायनरी विरोधी भूमिका स्पष्ट करण्यात आपण पुढाकार घ्यावा. बारसू -सोलगाव पंचक्रोशी परिसरात रिफायनरी प्रकल्प होत आहे. या प्रकल्पाविरोधात येत्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवा, अशी मागणी रिफायनरी विरोधी संघटनेने केली आहे. अशी मागणी रिफायनरी विरोधी संघटनेने आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवलीतील विजयभवन येथे आमदार वैभव नाईक यांची भेट घेतली आणि निवेदन दिले.
रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, सचिव सतीश बाणे, उपाध्यक्ष कमलाकर गुरव, दीपक जोशी, सदानंद सोगम, रमेश सोडये, रामचंद्र शेळके, भगवान सोगम, शशिकांत मांडवकर आदींची यावेळी उपस्थिती होती. संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘नाणार परिसरातील रद्द झालेली प्रदूषणकारी रिफायनरी आता बारसू -सोलगाव पंचक्रोशीत प्रस्तावित करण्यात शिक्कामोर्तब झाले आहे.
या रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पामुळे कोकणाचे रासायनिक नुकसान होणार आहे. या प्रकल्पाचे गंभीर दुष्परिणाम येथील स्थानिक व्यवसाय जसे हापूस आंबा, मासेमारी व पर्यटन या शाश्वत उपजीविकेच्या साधनांवर होऊन स्थानिक कोकणी माणूस लवकरच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या प्रकल्पाला कोकणात पायच ठेवू द्यायचा नाही आणि रोऊही द्यायचा नाही ही गोष्ट आपणा सारख्या कोकणप्रेमी लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित आहे.