तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला समर्थन-विरोध अशा दोन्ही बाजूंसोबत माती परीक्षणाला झालेला विरोध आणि त्यानंतर कातळशिल्पांचा पुढे आलेला मुद्दायावरून प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाची उभारणी जर-तरच्या हिंदोळ्यामध्ये अडकलेली आहे. असे असताना केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी २ लाख कोटींची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून अनेकांना रोजगार मिळणार आहे. त्याचवेळी प्रकल्पाच्या माध्यमातून देशासह राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणारच असल्याचे वक्तव्य केल्याने बारसू परिसरातील रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तालुक्यातील बारसू परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पाची उभारणी प्रस्तावित असल्याचे बोलले जात आहे. त्या अनुषंगाने मे महिन्यामध्ये माती परीक्षणाचेही काम हाती घेण्यात आले होते; मात्र, त्याला प्रकल्पविरोधी ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता.
हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी लोकवस्तीच्या पाऊलखुणा सांगणारी कातळशिल्पेही चर्चेत आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षामध्ये केलेली विविधांगी विकासकामे सर्वासमोर पोहचवण्याच्या उद्देशाने भाजपतर्फे महाजनसंपर्क अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गंत भाजपची सोमवारी जाहीर सभा झाली. त्यामध्ये नारायण राणे यांनी प्रकल्प होणार असल्याचे स्पष्ट केले. राजापूर तालुक्यातील प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असून याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांसोबत आपली चर्चाही झालेली आहे.