आघाडी सरकार काळात चिपळूण तालुक्यातील रिक्टोली-तिवडी गावांत धरणप्रकल्प मंजूर झाला होता. त्याचे सर्वेक्षण करण्यात आले. या कामाचे जलसंधारण विभागाकडून अंदाजपत्रक बनवून निविदा काढण्यात आली. एक वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे व भाजपप्रणित सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात कोकणातील मंजूर कामांना स्थगिती दिली. त्यात रिक्टोली-तिवडी धरणाच्या कामाला शासनाकडून स्थगिती दिली आहे. यामुळे हे धरण रखडले आहे.
रिक्टोली तिवडी धरणाचे अंदाजपत्रक अंदाजे रक्कम ५१- कोटी असून, यामध्ये ३०.६८ हेक्टर क्षेत्रे भूसंपादन केले जाणार आहे. जलवाहिनी, धरणाचे प्रत्यक्ष काम, इमारत, देखभाल अशी विविध कामे यामध्ये घेण्यात आली आहेत. या धरणामुळे २ हजार ८३५ सहस्र घनमीटर पाणी साठवण क्षमता यामध्ये केली जाणार आहे. यामुळे ०.१३ हेक्टर क्षेत्र बुडित क्षेत्र असून, २३६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या धरण प्रकल्पामुळे परिसरातील भूगर्भातील पाणीपातळी वाढ होणार असून, उन्हाळी शेती करण्याची संधी मिळणार आहे.
आमदार शेखर निकम यांनी रिक्टोली-तिवडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने या प्रकल्पाला मंजुरी मिळवली होती. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर ज्या कामांना स्थगिती दिली. त्यात रिक्टोली-तिवडी धरणाचा समावेश आहे. सध्या सत्तेत उपमुख्यमंत्रीपद मिळालेले अजित पवार यांना स्थानिक आमदार शेखर निकम यांनी पाठबळ दिल्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.