वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. पावसाचा फटका घाटातील रस्त्यांना बसला आहे. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर नाणीज येथे मध्यरात्री रस्ता खचल्याने सुमारे ११ तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प होती. मुंबई-गोवा महामार्गावर कामथे आणि परशुराम घाटातही रस्त्यावर किरकोळ माती खाली आली; मात्र वाहतुकीत अडथळा आलेला नव्हता. आज सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात ७४ मिमी सरासरी पाऊस झाला. त्यात मंडणगड ९०, दापोली १२१, खेड ६२, गुहागर ४२, चिपळूण १०९, संगेमश्वर ६१, रत्नागिरी ३२, लांजा ५९, राजापूर ९० मिमी पाऊस झाला. १ जूनपासून आतापर्यंत ४२९ मिमी सरासरी नोंद झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत २०० मिमी कमी पाऊस झाला.
खेडच्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडून ती ५.५ मीटरवर पोचली आहे. जगबुडीची इशारा पातळी पाच मीटर तर धोक्याची पातळी सात मीटर आहे. गुरुवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पडणारा मुसळधार पाऊस शुक्रवारी सकाळपर्यंत सुरूच होता. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मिऱ्या- रत्नागिरी-नागपूर महामार्गावर नाणीज शाळेजवळ रस्त्याचा भाग खचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. खचलेल्या भागामध्ये दोन ट्रक आणि बस अशी तीन वाहने रुंतली होती. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.
दोन्ही बाजूकडील वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मोठी वाहने काढण्यासाठी ठेकेदाराने आणलेली क्रेन चिखलात रुतल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी छोटी वाहने चोरवणेमार्गे सोडली. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक लांजा-दाभोळमार्गे वळवली. खचलेल्या भागात ३ ते चार भलेमोठे खड्डे पडलेले होते. दुरुस्तीचे काम सुमारे ११ तासांनंतर पूर्ववत झाले. कोल्हापूरहून येणारा भाजीपाला उशिरा रत्नागिरीत पोहोचला.