शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण गेल्या आठवडाभरापासून पडणाऱ्या पावसामुळे १५ टक्केच भरले आहे. काल (ता. २९) या धरणात ०.६७१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. शहराला दररोज पाणीपुरवठा होण्यासाठी धरण ५० टक्के भरण्याची गरज आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठ्यासाठी शहरवासीयांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. शहराच्या पाणीपुरवठ्यात गेल्या एप्रिल महिन्याच्या मध्यापासून बदल करण्यात आला. शहराचा खालचा आणि वरचा असे दोन भाग करण्यात आले. ज्या दिवशी शहराच्या वरच्या भागाला पाणीपुरवठा होत होता त्या दिवशी खालच्या भागात पाणीपुरवठा होत नव्हता.
ज्या दिवशी हे नियोजन झाले त्या दिवशी शीळ धरणात १.८०० दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होता. हे पाणी जूनअखेरपर्यंत पुरणारे होते. पाणीकपातीचा निर्णय झाल्यानंतर अनेकांकडून विरोध झाला; परंतु आता पाऊस लांबल्यानंतर मुख्याधिकारी तुषार बाबर आणि पाणी विभागाचे अभियंता अविनाश भोईर यांनी केलेले नियोजन योग्य असल्याचे स्पष्ट झाले. शीळ धरणात ०.२६५ दशलक्ष घनमीटर साठा होता. गेल्या शनिवारपासून रत्नागिरीत पाऊसाला सुरवात झाली; परंतु कोसळणाऱ्या पावसामध्ये सातत्य नसल्याने धरणातील साठा समाधानकारक झालेला नाही. गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे; परंतु पडलेल्या पावसाने धरणसाठ्यात फारशी वाढ झाली नाही.