उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादी भूमिकेतून औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि दि.बा.पाटील यांचं नाव विमानतळाला दिलं होतं. या निर्णयांना स्थगिती का देण्यात आली ? हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायला हवं कारण एकनाथ शिंदे यांच्या हातात काहीच नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली.
खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला असेल तर हे सरकार महाराष्ट्रद्रोही असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. हे तिन्ही निर्णय फिरवले असतील आणि खरं असेल तर हे सरकार महाराष्ट्रद्रोही असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
राजकीय, आर्थिक , बुलेट ट्रेन, आरेचा विषय आम्ही समजू शकतो, आम्ही संघर्ष करु पण औरंगजेब तुमचा नातेवाईक कसा झाला?, निजाम काळातील उस्मान तुमचा कोण लागतो, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच दि.बा. पाटील याचं नाव देण्याचा निर्णय हा लोकभावनेचा आदर म्हणून निर्णय घेतला होता. पण हे सरकार गोंधळलेलं आहे. या सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार असल्याने केवळ स्थगिती, स्थगिती, स्थगिती असं शिंदे भाजप सरकारचं सुरु आहे, अशी बोचरी टीका देखील संजय राऊत यांनी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, मी शिवसेनेचा मालक आहे का, ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. लाखो शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी प्राण देण्यासाठी तयार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहणं याला शिवसेना संपवणं म्हणत असेल तर निष्ठेच्या व्याख्या बदलाव्या लागतील. ज्यांना शिवसेना संपवायची होती ते भाजपसोबत गेले आहेत. पण एक दिवस शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणं झेपावेल आणि राज्याच्या सत्तेत येईल.