तालुक्यात शहर व ग्रामीण भागात गेल्या २४ तासांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या ४८ तासांत ६२ मिमी पावसाची नोंद झाली असून, १ जूनपासून एकूण ३४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खेड तालुक्यात संततधारेमुळे नद्यांमधील पाण्याची पातळी वाढली असून, जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. पावसाच्या जोरदार सरींमुळे मासे खवय्यांनी शेताचे बांध, नदीकिनारी मासे पकडण्यासाठी गर्दी केली आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. ग्रामीण भागात शेतात नांगरणी सुरू झाली असून, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांनीदेखील सुटकेचा निःश्वास टाकला आहे. २७ जूनला मध्यरात्रीनंतरच पावसाच्या मुसळधार सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे शहरीभागात बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी नांगरणी, चिखलणी करण्यावर भर दिला आहे. तालुक्यातील नातूवाडी धरणक्षेत्रामध्ये गेल्या २४ तासांत १५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, एकूण ६८५ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
जिल्ह्याच्या तुलनेत खेड तालुक्यात पावसाची नोंद कमी असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत १०० मिलिमीटर जास्त पावसाची नोंद झाली आहे. आगामी ४८ तासात त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांपासून सततधार पावसामुळे तालुक्यातील प्रमुख नद्या असलेल्या जगबुडी व नारंगी नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. जगबुडी नदीची पाणीपातळी पाच मिटर एवढी असून, जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.