महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून हर्णे (ता. दापोली) येथे मरीन पार्क; तर निवेंडी (ता. रत्नागिरी) येथे कॅश्यू आणि मँगो पार्क उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी प्राथमिक सर्व्हे करून प्रकल्पाचा आराखडा बनविण्याचे काम (डीपीआर) बनविण्याचे खासगी एजन्सीकडून सुरू झाले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने दापोली आणि रत्नागिरी या ठिकाणी प्रदूषण विरहित एमआयडीसी येणार आहे. त्यामुळे आंबा, काजू आणि मासेमारीवर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत केमिकल, कृषी आणि इंजिनिअरिंग कारखान्यांसाठी एमआयडीसी स्थापन झाल्या. केमिकल आणि रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे लोटे परिसरातील अनेक गावे बाधित झाली.
अनेक लोकप्रतिनिधींनी कोकणाच्या निसर्गाला बाधा न पोहचता येथील रोजगाराला चालना देण्याची घोषणा केली. त्यासाठी प्रदूषणविरहित कारखाने आणण्याचे देण्यात आले. गुहागरमध्ये टेक्स्टाईल उद्योग वाढवण्यासाठी एमआयडीसी आणण्याचे प्रयत्न असल्याचे आमदार भास्कर जाधव अनेक वर्षे सांगत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आंबा, काजू आणि मासे प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचे काम केले आहे. त्यामुळे भविष्यात प्रक्रिया क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल शक्य होणार आहे. हर्णे येथील मरीन पार्कचे काम जलदगतीने सुरू आहे. येथील भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने सुरू केली जाणार आहे. येथे काही एकर जागा शासनाची आहे. त्याचा फायदा या प्रकल्पाला होणार आहे.
मरीन पार्क प्रत्यक्षात अस्तित्वात आणताना येथील कारखानदारांना वीज, पाणी, रस्ते आणि इतर सुविधा कशा देता येतील, यासाठी डीपीआर तयार केला जात आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हर्णे मरीन पार्कसाठी जाहीर सूचना काढली आहे. सी फूड प्रोसेसिंग युनिट्सच्या स्थापनेसाठी भूखंड भाडेतत्त्वावर घेण्यासाठी ज्यांना स्वारस्य आहे. त्यांना ९५ वर्षांच्या नोंदणीकृत लीज डीडवर भूखंड दिले जाणार आहे. १ एकरपासून ४ एकरपर्यंतचे भूखंड उपलब्ध केले जाणार आहे. हर्णे (ता. दापोली) आणि निवेंडी (ता. रत्नागरी) येथील प्रत्येकी सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे.