रत्नागिरीतील चिपळूण मधील वाढलेले सावकारी धंद्याचे पेव पाहता, सामान्य जनता त्यामध्ये भरडली जात असल्याचे समोर आले आहे. चिपळूणमधील एका रिक्षा व्यावसायिकाने केलेल्या आत्म्हत्येवरून सावकारी धंद्याचा पर्दाफाश झाला आहे, आणि संबंधित यंत्रणाही सतर्क झाली आहे.
कोरोनाच्या काळात आलेल्या आर्थिक तंगीमुळे सावकाराकडून कर्ज घेतलेल्यांची जर जीवानिशी पिळवणूक होत असेल, तर न घाबरता थेट सहायक निबंधक कार्यालयाकडे संपर्क साधण्याचे आवाहन येथील सहायक निबंधक रोहिदास बांगर यांनी चिपळूणवासीयांना केले आहे, तसेच यापुढे सावकारी धंदा करणाऱ्यांची तपासणी मोहीम सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे चिपळुणात सावकारी धंदा करणाऱ्यांवर कडक नजर राहणार आहे.
चिपळूण शहर परिसरातील गुरव नामक व्यक्तीने सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने या सावकारी धंद्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्याचप्रमाणे या सावकारीच्या तिढ्यात अडकलेल्या अनेक लोकांच्या तक्रारी आता दाखल व्हायला लागल्या आहेत. सावकारांनी वसुलीसाठी ठेवलेल्या व्यक्ती पैसे नाही दिले तर, घरातील मौल्यवान वस्तू सुद्धा उचलून न्यायला लागले असल्याने, जन सामन्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सहायक निबंधक कार्यालयातील बांगर यांनी दिलेल्या माहितीमध्ये, चिपळूणमध्ये तब्बल १९ परवानाधारक सावकारी धंदा करणारे असून, तारण आणि विनातारण अशा दोन प्रकारामध्ये ते आपला व्यवसाय करून शकतात. यामध्ये तारण पद्धतीमध्ये वर्षाला १२% आणि आणि विनातारण वर्षाला १५% असे व्याज आकारले जाते. एखाद्याने दिलेल्या कर्जाचे पैसे दिले नाहीत तर, सावकार दिवाणी न्यायालयात जाऊन कर्ज वसुलीसाठी दाद मागू शकण्यापर्यंतचेच अधिकार त्यांच्याकडे आहेत. थकितांची वसुली करण्यासाठी त्यांच्या प्रॉपर्टी अथवा वाहने जप्त करण्याचा कोणताही अधिकार सावकारी धंदा करणार्यांना दिलेला नाही. जर अशा प्रकारची पिळवणूक केली जात असेल तर, सरळ पोलीस ठाण्यात जाऊन अथवा सहायक निबंधक कार्यालयात येऊन लेखी तक्रार द्यावी, त्वरित कारवाई करण्यात येईल.