रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातून जॅकवेलपर्यंत पाईप जोडणी करण्याचे काम संबंधित ठेकेदार कंपनीने १३ मेपर्यंत काम पूर्ण करणे आवश्यक होते; परंतु दिरंगाई केल्यामुळे ठेकेदाराविरुद्ध रत्नागिरी नगरपालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. पाईपलाईनचे काम सुरू करण्याचे आदेश १४ मार्चला देण्यात आले होते. त्यात शीळ धरणापासून जॅकवेलपर्यंतची पाईप जोडणीचा समावेश होता. हे काम १३ मेपर्यंत पूर्ण करावे, असे सूचित करण्यात आले होते; परंतु हे काम वेळेत पूर्ण केले नाही.
धरणापासून जॅकवेलपर्यंत टाकण्यात आलेला पाईप पावसाळ्याच्या तोंडावर बसवल्यामुळे तो निसटून गेला आणि ते वाहत नदीच्या दुसऱ्या काठापर्यंत गेले. ते एकत्र करून पुन्हा बसवण्याची जबाबदारी ठेकेदाराची असून त्यामध्ये एकही रुपया खर्च करणार नसल्यान्ने पालिकेकडून सांगण्यात आले. पावसाळ्यानंतर हे काम कंत्राटदार सुरू करेल आणि लवकरात लवकर पूर्ण करेल, अशी अपेक्षा आहे. शीळ धरणापासून जॅकवेलकडे जाणाऱ्या पाईप जोडणीपैकी १९८ मीटर पाईप धरणाखाली आहेत.
त्यापैकी १०० मीटर पाईप वाहिले असून, मातीखाली २६२ मीटरचे काम आहे. त्यापैकी २५० मीटर काम पूर्ण झाले आहे. बाकीचे अपूर्ण आहे. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही. आतापर्यंत देण्यात आलेल्या कामापैकी एकही रुपया पालिकेने कंत्राटदाराला दिलेला नाही. काम पूर्ण झाल्याशिवाय रक्कम देण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कामात हलगर्जीपणा केल्यामुळे ठेकेदाराला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.