१९ जुलै रोजी जगबुडीच्या पुराचे पाणी मुख्य बाजारपेठेसह घरांमध्ये घुसून २२ तास पूरस्थिती कायम राहिली होती. या पूरस्थितीत तब्बल ३७५ दुकांनांना फटका बसला असून ६८ घरेही बाधित झाली आहेत. महसूलच्या ८ पथकांकडून पूरग्रस्त दुकानांसह बाधित घरांचे पंचनाम्यांचे काम पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी दिली. सलग २ दिवस थैमान घातलेल्या पावसामुळे जगबुडीच्या पुराचे पाणी नदीकाठच्या मटण मच्छीमार्केट, पोत्रिक मोहल्ला, सफा मस्जिद चौक, गुजरआळीतील घरांसह मटण मच्छीमार्केट, निवाचा तळ, वाल्की गल्ली, पानगल्ली, गुजरआळीसह मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौकातील दुकानांमध्ये घुसल्याने एकच हाहाकार उडाला होता. याशिवाय तीनबत्तीनाका येथील दुकानांमध्येही पुराचे पाणी घुसले होते. सलग २२ तास बाजारपेठ पुराच्या पाण्यात राहिल्याने दुकानांसह साहित्यांची नासधूस होवून व्यापाऱ्यांची कोट्यवधी रूपयांची हानी झाली आहे.
पूरस्थिती ओसरल्यानंतर नगर प्रशासनाने स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. व्यापारीही सलग ३ दिवस दुकानांच्या स्वच्छतेत गुंतले होते. अजूनही मुख्य बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहार ठप्पच आहेत. पूरस्थिती ओसल्यानंतर आमदार योगेश कदम यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. येथील महसूल विभागानेही पूरग्रस्त दुकानांसह बाधित घरांच्या पंचनाम्यांसाठी तातडीने ८ पथके तैनात करण्यात आली या पथकातील मंडल अधिकारी, तलाठी, नगर परिषदेचे कर्मचारी अशा 40 कर्मचाऱ्यांमार्फत पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले. अवघ्या २ दिवसातच पथकाने तब्बल ३७५ पूरग्रस्त दुकानांसह ६८ घरांचे पंचनामे पूर्ण कले. नुकसानीचा आकडा मात्र, समजू शकलेला नाही.