राजकारणी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी निवडणुकीपूर्वी सामान्य जनतेला अनेक आश्वासने दाखवून अखेर त्यांना दाखविलेल्या आश्वासनांकडे सपशेल पाठ फिरवतात. कोकणची निवडणूक कोकण विद्यापीठ मुद्द्यावर लढवली आणि ती जिंकली देखील. परंतु नेत्यानी केवळ निवडणुकीसाठी वापरण्यात आलेला मुद्दा आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ व्हावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंटस् युनियन अर्थात मासू या विद्यार्थी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. कोकणातील रत्नागिरीमधील ४५, सिंधुदुर्गमधील ३८ अशी मिळून ८३ महाविद्यालयांकरिता स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, असे महाराष्ट्र स्टुडंटस् युनियनचे कोकण विभाग प्रमुख ॲड. गौरव शेलार यांनी सांगितले.
कोकण विद्यापीठ हवे आहे की नाही! जर हवे असेल तर मग पुढची निवडणूक आली तरी आजपर्यंत कोकण विद्यापीठ न होण्यामागची कारणे कोणती? कोकण विद्यापीठासाठी केव्हा आणि कुणाला पत्रव्यवहार केला ? कुठल्या विधानसभेत किंवा संसदेत कधी आणि केव्हा प्रश्न उपस्थित केला आहे का ? हे लोकप्रतिनिधींनी आता स्पष्टपणे जनते समोर आणावे.
कोकणचे स्वतः:ची अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत परंतु, राज्यस्तरावर कोकणची छाप पाडण्यात सर्व स्थानिक राजकीय नेत्यांना कायमच अपयश आले असल्याचे दिसून येत आहे. कोकणामध्ये विविध विषयांमध्ये अनेक पारंगत, उत्कृष्ट ज्ञान असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, परंतु, योग्य ते मार्गदर्शन आणि वाव न मिळाल्याने त्यांची शैक्षणिक पात्रता खुंटत चालली आहे.
अनेक राजकारण्यांनी स्वतंत्र कोकण विद्यापीठ व्हावे यासाठी आजपर्यंत अनेक आश्वासने दिली. परंतु यावर अजून ठोस निर्णय नाही. यामुळेच कोकणचा अजूनही शैक्षणिकदृष्ट्या विकास झालेला नाही, असेही शेलार म्हणाले.