राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळाच्या रत्नागिरीतील मध्यवर्ती बसस्थानकाचे सात वर्षे रखडलेले काम अखेर पूर्ण झाले आहे. बसस्थानक नसल्यामुळे ऊन-पावसाचा मारा झेलत गाड्यांची प्रतीक्षा करणाऱ्या ग्रामीण भागातील प्रवाशांनी निःश्वास सोडला आहे. रस्त्याच्या बाजूला एसटीची वाट बघत बसण्याचा प्रवाशांचा वनवास संपला आहे. राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळाच्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम सात वर्षे रखडले होते. जुन्या ठेकेदाराला काढून हे काम निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे सुपुर्द करण्यात आले. त्यांनी अवघ्या १८ महिन्यांत हे बसस्थानक पूर्ण केले. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामामुळे १२ वर्षांपूर्वी बसस्थानक रहाटागर येथे स्थलांतरित केले होते. त्यामुळे सर्व गाड्या रहाटागर येथूनच धावत होत्या. सुरुवातीला बीओटी तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या एसटी बसस्थानकाचे काम रखडले होते. हे काम सुरू करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न केले होते; पण ठेकेदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही.
उद्योगमंत्रिपद मिळाल्यानंतर सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून निधी उपलब्ध करून दिला. तसेच जुन्या ठेकेदाराकडील काम काढून निर्माण कंपनीला ठेका दिला. त्यांनी दर्जेदार काम करत बसस्थानकाच्या इमारतीचे काम पूर्ण केले. रविवारी याचा लोकार्पण सोहळा झाला आणि सोमवारपासून लालपरी नव्या बसस्थानकातून धावू लागली आहे. गेली सात वर्षे भरउन्हात बसची वाट पाहत राहण्याची वेळ प्रवाशांवर आली होती. कधी उन्हाचा तर कधी पावसाचा तडाखा झेलत प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागत होते. नूतन बसस्थानकामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
बसस्थानकाची दुमजली इमारत – रत्नागिरीतील या बसस्थानकाची इमारत दुमजली आहे. तळमजल्यावर शहरी तर वरच्या मजल्यावर ग्रामीण, लांब व मध्यम पल्ल्याच्या एसटी बसेस सोडण्यात येत आहेत. शहरी बसेस दिवसाला ५०० तर ग्रामीण, लांब व मध्यम पल्ल्याच्या दिवसभरात १००० गाड्या धावतात.