गेल्या महिन्यापासून भारतातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचे दिसून येत आहे. या काळामध्ये कोरोना लसीचे कित्येक कोटी लस देण्याचा टप्पा पार केल्याच्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्यामध्ये आता आणखी एका सकारात्मक गोष्टीची भर पडली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतामध्ये घेण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने ७० कोटी पर्यंत डोसचा टप्पा पार केला आहे.
यूथ बार असोसिएशन नावाच्या संस्थेने, घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात यावे अशी याचिका दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे कि, जर लसीकरण घरोघरी जाऊन केले तर, सध्याच्या लसीकरणाच्या मोहिमेला अजून वेग येईल. याचा विशेष फायदा वयोवृद्ध नागरिक, आजारी, दिव्यांग आणि इतर दुर्बल घटकांना होणार आहे. सध्या सुरु असलेल्या लसीकरण कार्यक्रमाचा वेग हा व्यवस्थित आहे असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा आदेश द्यावा, अशा आशयाच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, घरोघरी जाऊन लसीकरण करायचे म्हटल्यावर प्रशासनासमोर अनेक अडचणी उभ्या राहतील. देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमावर सुरुवातीपासून सुप्रीम कोर्टाचे लक्ष आहे. लसीकरणाचा कार्यक्रम सध्या देशामध्ये योग्य वेगाने आणि दिशेने व्यवस्थित सुरू आहे.
मागील आठवड्यामध्ये भारतात एकाच दिवसात एक कोटीहून अधिक डोस देण्याचा विक्रम तीनवेळा झाला आहे. मंगळवारी एकाच दिवसात १.१३ कोटी लोकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने येत्या काळामध्ये लसीकरणाच्या वेगमध्ये अजून गती येणार असल्याचे सांगितले आहे.