‘माझी माती, माझा देश’ उपक्रमाचा प्रारंभ होत आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व कार्यालयांत ‘पंचप्राण शपथ’ कार्यक्रम घेण्यात येत आहेत. मातीचा दिवा हाती धरून काढलेली सेल्फी काढून संकेतस्थळावर अपलोड करा आणि या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे. जिल्ह्यात ९ ते २० ऑगस्टदरम्यान, ‘माझी माती, माझा देश’ मोहिमेत गाव आणि गटस्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर कार्यक्रम होणार आहेत. यात देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असून, स्थानिक लोकप्रतिनिधी व लोकसहभागातून हे अभियान आयोजित करण्यात येत आहेत.
पंचप्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ९ तालुकयतील ८४६ ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक लावण्याचे काम सुरू आहे तसेच ७५ देशी वृक्षांची रोपे वनविभाग आणि सामाजिक वनिकरण विभागाकडून उपलब्ध करून घेण्यात येत आहेत. भारताला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी हे उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये नागरिकांनीदेखील सहभागी होऊन माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेली सेल्फी https://merimaatimeradesh. gov.in या संकेतस्थळावर अपलोड करा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.