मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात भरावावर केलेल्या काँक्रिटीकरणाला भेगा पडल्या. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्याची दखल घेत ठेकेदार कल्याण टोलवेज कंपनीला डागडुजी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी कामाला सुरुवात झाली. ही दुरुस्ती तात्पुरती करण्यात येत असून, घाटात प्रवाशांना वाहतुकीसाठी कोणताही अडथळा तसेच कोणताही धोका नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाने स्पष्ट केले आहे. जूनमध्ये परशुराम घाटातील एका लेनचे काम पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्याच्या तोंडावर त्वरित या लेनवरून वाहतूक सुरू केली आहे. मात्र, पहिल्याच पावसात दरडीच्या बाजूने असलेल्या काँक्रिटीकरणाला सुमारे दीडशे मीटरच्या आसपास भेगा पडल्या आहेत.
त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. याबाबत अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागावर धडक दिली होती. घाटात काँक्रिटीकरणाला तडे गेलेच शिवाय सरंक्षक भिंतीलाही तडे गेल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांना सांगितली होती. या घटनेची मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली असून, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना डागडुजी करण्याचे आदेश दिले पडलेल्या भेगा सिमेंटने भरण्यात येत आहेत. त्यानुसार काँक्रिटीकरणाला आहेत.
२४ जूनला पावसाला सुरवात झाल्यानंतर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. त्या वेळी नव्याने केलेल्या काँक्रिटीकरणास पुरेसा कालावधी मिळाला नव्हता. तरीही डोंगराकडील बाजूस दरड आल्यानंतर प्रवाशांना धोका पोहोचू नये यासाठी काँक्रिटीकरणास १४ दिवसाचा कालावधी मिळाला नसताही वाहतूक सुरू करण्यात आली. जिथे रस्ता खराब होईल तिथे दुसरी लेन पूर्ण झाल्यावर दुरुस्ती करण्याचे नियोजन केले होते.
पावसाळ्यानंतर दरडीच्या बाजूची लेन पूर्ण झाल्यावर त्या मार्गावर वाहतूक वळवून हे काँक्रिटीकरण नव्याने करण्यात येईल, असेही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या मार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्यास कोणताही धोका नाही; मात्र, दरडप्रवण क्षेत्रात वाहने सावकाश चालवावीत, असे आवाहन केले आहे. यासाठी परशुराम घाटात वाहने सावकाश चालवावीत, असे फलक लावले आहेत