25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeRajapurरिफायनरी प्रकल्पाविरोधात २० जुलैला मुंबईत विराट मोर्चा

रिफायनरी प्रकल्पाविरोधात २० जुलैला मुंबईत विराट मोर्चा

बारसू- सोलगांव रिफायनरी प्रकल्पाविरोधात येत्या २० जुलैला मुंबईत विराट मोर्चा धडकणार असून त्यानिमित्ताने या प्रकल्पाविरोधातील लढा आता राज्यव्यापी करण्याचा निर्धार रविवारी येथे झालेल्या बारसू- सोलगांव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना ग्रामीण व मुंबई यांच्या सभेत करण्यात आला. २ जुलै रोजी सोलगांव येथे ही सभा झाली. या सभेत २४ एप्रिल ते ११ मे या दरम्यान झालेल्या आंदोलनाचा आढावा घेण्यात आला. तसेच आंदोलनादरम्यान दडपशाहीचा वापर केल्याबद्दल पोलीस दल तसेच सरकारचा तीव्र निषेधदेखील या सभेत करण्यात आला. आंदोलनाचे नियोजन आणि धोरणाबाबतही चर्चा झाली. आंदोलक आणि ग्रामस्थांवर दाखल झालेल्या पोलीस केसेसविषयी विशेष चर्चा करून कायदेशीर मदतीबाबतचा विचारविनिमय करण्यात आला..

यानंतर बारसू रिफायनरीविरोधी आंदोलन साऱ्या राज्यभर पोहोचवण्याविषयी बैठकीत चर्चा झाली. कोकणातील जनता बारसू रिफायनरी प्रकल्पासह कोकणात होणाऱ्या केमिकल झोनच्या ठाम विरोधात असल्याचे सांगण्यात आले. बारसू रिफायनरीविरोधी राज्यव्यापी लढा समिती व बारसू-सोलगांव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत २० जुलैला मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाच्या तयारीविषयी सविस्तर चर्चा या सभेत झाली. मोर्चाच्यानिमित्ताने विरोधाची धार अधिक तीव्र करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. या सभेला दोन्ही संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular