गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधात साजरा होणार नवरात्रोत्सव यंदा धुमधडाक्यात साजरा होत आहे. यंदा राज्यातील जनतेला नवरात्रोत्सवाचा आनंद घेता यावा म्हणून शिंदे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, यंदाच्या नवरात्रौत्सवात गरबा-दांडीयाला मध्यरात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्यावी अशी विनंती करत मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली होती. जी आता सरकारने मान्य केली आहे. कोरोनाच्या काळात सलग दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता. निर्बंध असल्याने सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या. यावेळी त्यावरील निर्बंध मागे घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.
तत्पूर्वी सरकारने शेवटचे फक्त दोन दिवस १२ वाजेपर्यंत गरबा खेळण्याची परवानगी दिली होती. मात्र आता सरकारने यात आणखी एक दिवसाची वाढ केली आहे. आधी ही वेळ १० पर्यंत होती. मात्र आता १२ वाजेपर्यंत सूट दिल्याने सोमवार, मंगळवार आणि शनिवार या तीन दिवशी अनेकांना गरबा खेळण्याचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच मुंबईमध्ये यंदा ३ व ४ ऑक्टोबर व्यतिरिक्त १ ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीक्षेपक वापरास वाढीव दिवसाची सूट देण्याचा निर्णयही घेतला आहे.