27.3 C
Ratnagiri
Wednesday, June 4, 2025

काळबादेवी येथे उभारणार ‘उड्डाण पूल’, सामंत बंधूंच्या उपस्थितीत बैठक

काळबादेवी येथून जाणाऱ्या सागरी महामार्गाबाबत महत्त्वपूर्ण बैठक...

परशुराम घाटातील भरावाची माती घुसली शेतीत; विहीर, मोरीही भरली गाळाने

मुंबई-गोवाराष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात गतवर्षी पावसाळा संपता...

वैभव खडेकर यांची नाराजी! राज ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोकणातील खंदा...
HomeChiplunचिपळुणात नदीपात्रात अडकलेल्या तिघांना जीवाची बाजी लावून सुखरूप बाहेर काढले

चिपळुणात नदीपात्रात अडकलेल्या तिघांना जीवाची बाजी लावून सुखरूप बाहेर काढले

प्रचंड प्रवाहाबरोबर तब्बल ४ तास त्यांचे जणू युद्ध सुरू होते.

पहिल्याच पावसात चढणीचे मासे पकडण्याचा छंद वेगळाच….. या छंदापायी दळवटणे येथील तिघेजण पिंपळी सोनारवाडी नदीपात्रात उतरले. मासे पकडण्याच्या नादात पाण्याच्या प्रवाहाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. चारही बाजूने पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला, आणि तिघेही त्यामध्ये अडकले. सर्वत्र एकच हाहाकार उडाला. आपत्तीव्यवस्थापन पथक तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले आणि तब्बल ४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर सर्वांना सुखरूप बाहेर काढले. रविवारी (२५ मे) रात्री उशीरा ही घटना घडली. यावेळी २० मे पासूनच पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. चिपळूणचा पाऊस हा नेहमीच वेगळा असतो. परंतु पहिल्या पावसात चढणीचे मासे पकडण्याचा छंद अनेकांना आवरत नाही. खळखळत्या पाण्यावर ताजे फडफडीत मासे पकडणे आणि त्यावर ताव मारणे हा जणू कोकणात जोपासला जाणारा पारंपरिक छंद आहे. पण हाच छंद कधीकाळी जीवावर बेतेल याची कल्पनादेखील कोणाला नसेल. पण चिपळूणमध्ये रविवारी त्याचा प्रत्यय आला आणि सर्वाचाच थरकाप उडाला.

दळवटणेतील तिघे – चढणीचे मासे पकडण्यासाठी रविवारी चिपळूण दळवटणे येथील संतोष पवार, त्यांच्या पत्नी सुरेखा पवार तसेच त्यांचा पुतण्या ओंकार पवार हे तिघेजण पिंपळी येथील सोनारवाडी नदीपात्रात गेले होते. पाऊस प्रचंड पडत होता आणि संध्याकाळची वेळ होती त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाकडे त्यांचे लक्षच राहिले नाही. मासे पकडण्यात ते मग्न होते. परंतु निसर्ग कधी कोणासाठी थांबत नाही. निसर्गाने आपले काम चोख बजावले.

पाण्याच्या प्रवाहाने घेरले – मासे पकडण्यात मग्न असलेल्या पवार कुटुंबाला पाण्याच्या प्रवाहाने चौफेर घेरले. पाण्याचा प्रवाह इतका वाढला की त्यातून मार्ग काढणे कठीण बनले. आपण अडकलो आहोत आणि आता आपले काय खरे नाही, हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकताच आजूबाजूचे ग्रामस्थ धावले. परंतु पाण्याचे रौद्ररूप पाहताच सर्वजण थबकले. काही तरुणांनी धाडस दाखवले परंतु तेही अपयशी ठरले. लगेच तहसीलदार तसेच पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आणि आपत्ती व्यवस्थापन अॅक्शन मोडवर आलेः

प्रशासनाची धावाधाव – चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे, मुख्याधिकारी विशाल ‘भोसले यांच्यासह चिपळूण नगरपालिकेचे आपत्तीव्यवस्थापन पथक, महसूलचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले. समोरचे दृश्य पाहता वेळ न दवडता बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. अग्निशमन दल, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक तसेच तत्सम साहित्यदेखील उपलब्ध करण्यात आले होते. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी तैनात होतेः

तब्बल ४ तास अथक प्रयत्न – आपत्ती व्यस्थापनाचे पथक तसेच पोलीस आणि स्थानिक तरुण असे सर्वचजण बचावकार्यासाठी उतरले. पाण्याचा प्रवाहे प्रचंड असल्याने अनेक अडचणी येत होत्या. परंतु पथकाने जीवाची बाजी लावली. प्रचंड प्रवाहाबरोबर तब्बल ४ तास त्यांचे जणू युद्ध सुरू होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करत अखेर बचाव पथक प्रथम ओंकार पवार या मुलाकडे पोहोचले आणि सर्वप्रथम त्याला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सुरेखा पवार व संतोष पवार यांना बाहेर काढून वैद्यकीय तपासणी करण्यात आंली. घाबरलेले असल्याने त्यांच्यावर उपचार करण्याची गरज होती. सर्वांनी त्यांना धीर देऊन वैद्यकीय पथकाने त्याच ठिकाणी उपचार देखील दिले. आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून जिवाची बाजी लावल्यानेच तिघांचे जीव वाचले. त्यामुळे प्रशासनाच्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular