शासनाने यंदा आनंदाचा शिधा वाटपाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दिल्या जाणाऱ्या सहा वस्तूंपैकी चार वस्तू अर्धा किलोच दिल्या जाणार आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांनी नाराजी व्यक्त केली. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना अजून ते संच तालुक्यातील रेशनदुकानांपर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांना शिधा वाटपाचा मुहूर्त हुकला आहे. पुरवठा विभागाकडून दिवाळीसाठी प्राधान्य व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा संच शंभर रुपयांत दिला जाणार आहे.
पूर्वी आनंदाचा शिधा संचात एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर खाद्यतेल अशा चार वस्तू होत्या. यावर्षी या संचात मैदा व पोहे या दोन वस्तूंची भर पडली आहे. या दोन वस्तू वाढविण्यात आल्या तरी सहापैकी चार वस्तूंचे वजन कमी करण्यात आले आहे. त्यामध्ये एक लिटर खाद्यतेल, एक किलो साखर तर रवा, पोहे, मैदा, चणाडाळ या वस्तू अर्धा किलोच आहेत. संचात दिलेल्या वस्तू किमान एक किलो तरी द्यायला हव्या होत्या, अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत. चिपळूण तालुक्यात ३१ हजार ७७९ प्राधान्य शिधापत्रिकाधारक तर ५ हजार ६८६ अंत्योदय शिधापत्रिकाधारक असे एकूण ३७ हजार ४६५ शिधापत्रिकाधारक आहेत.
१४८ रास्तदर धान्य दुकानातून त्यांना हा आनंदाचा शिधा वाटप होणार आहे. दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही आंनदाचा शिधाचे तालुक्यात वाटप झालेले नाही. गतवर्षी आनंदाचा शिधा वाटपावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. दिवाळी सुरू झाली तरीही संच संबंधित लाभार्थी कुटुंबांपर्यंत पोहोचले नव्हते. यावर्षी दिवाळीच्या काही दिवस अगोदर या आनंदाचा शिधा संचाचे वाटप व्हावे, अशी रास्त अपेक्षा आता शिधाधारक व्यक्त करीत आहेत.