भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे रविवारी (ता. १३) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षीसुद्धा भर पावसात या सायकल रॅलीला आबालवृद्धांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. याही वर्षी सुद्धा असाच अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल, असा विश्वास क्लबने व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी हर घर तिरंगा अभियानांतर्गत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने (आरसीसी) काढलेली सायकल रॅली प्रत्येक रत्नागिरीकराच्या आठवणीत राहणारी अशी होती. भर पावसात १०० सायकलिस्ट रत्नागिरीच्या कानाकोपऱ्यात हर घर तिरंगा या अभियानाच्या प्रसारासाठी फिरले होते. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही रॅली तेवढ्याच उत्साहात काढण्यात येणार आहे.
रॅलीतील सहभागी सायकलस्वारांना सायकलला लावण्यासाठी छोट्या आकारातील तिरंगा राष्ट्रध्वज नजीकच्या टपाल कार्यालयात सशुल्क उपलब्ध आहे. तिरंगा ध्वजाचा अवमान होणार नाही, याची खबरदारी स्वारांनी घेणे आवश्यक आहे. यापूर्वी रत्नागिरीत जिल्हा सायकल संमेलनाचे आयोजन तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सायकल रॅली काढून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने जनजागृती केली आहे. त्यामुळे या तिरंगा रॅलीलासुद्धा अभूतपूर्व प्रतिसाद मिळण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
ही रॅली १३ ऑगस्टला सकाळी ८ वा. मारुती मंदिर येथून सुरू होणार आहे. त्यानंतर नाचणे रोड, साळवी स्टॉप, मारुती मंदिर, माळनाका, जयस्तंभ, रामआळी, गाडीतळ, टिळक आळी, बंदररोड आठवडा बाजारमार्गे जयस्तंभ या मार्गावर काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये १० वर्षांवरील विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिक, महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले आहे. अधिक माहितीसाठी डबल एसआर अमित कवितके, एसआर डॉ. नितीन सनगर, दर्शन जाधव, महेश सावंत (बॉबी) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले आहे.