कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून बंद असलेली शाळा आणि महाविद्यालये कधी सुरु होणार याबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. राज्य सरकार महाविद्यालये सुरू करण्याबाबत सकारात्मक आहे, परंतु कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेता महाविद्यालये कधीपर्यंत सुरू करण्यात यावी याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
नाम. उदय सामंत म्हणाले कि, विविध जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी, कुलगुरूंसमवेत महाविद्यालये सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी या निर्णयाबाबत सकारात्मक आहेत. परंतु, कोरोनाची स्थिती विचारात घेऊनच, महाविद्यालये सुरू करावी लागणार आहे. उगीच घाई करून उपयोग होणार नाही. त्यामुळे ज्याक्षणी तिसर्या लाटेसंदर्भातील सर्व संभ्रम दूर होतील, त्याक्षणी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
सध्या केरळमध्ये कोरोना बाधितांची रुग्ण संख्या लक्षात घेता, त्यामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. काही तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे कि, हि कदाचित संभाव्य तिसर्या लाटेची सुरुवात असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर केंद्राने जास्तीत जास्त खबरदारी घेण्याच्या सूचना राज्यांना केल्या आहेत. यामुळे शाळा आणि कॉलेज सुरु करण्याबाबत संभाव्य तिसर्या लाटेची अगदी तालुकास्तरीय स्थिती पाहून पुढील पाऊल टाकावे लागणार असल्याचे नाम. सामंत यांनी स्पष्ट केले आहे. कारण मागील वेळेला कोरोना स्थितीचे आटोक्यात आलेलं प्रमाण बघून महाविद्यालये सुरू करण्याचे जाहीर केल्यानंतर, १५ दिवसांनंतरच दुसरी लाट आलेली. त्यामुळे तेंव्हा महाविद्यालये सुरू करता नाही आलेली. त्यामुळे यावेळी कोणतीही घाई न करता, अजून सावधगिरी बाळगुण निर्णय घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.