कोकणात निवडणुकीच्या निकालाने ठाकरे गटाला जास्त साथ मिळाल्याने, स्थानिक त्या त्या विभागातील आमदार आणि खासदारांच्या घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाल्याचे बोलले जात आहे. लागलेल्या निकालात २२ पैकी ११ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सरपंच निवडून आले आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी दिली. यात कासारवेली, चांदोंर, टिके, तोंणदे, टेंबे, तरवळ, पूर्णगड फणसवळे, तरवळ मावळंगे, भगवती नगर, मालगुंड या ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचे सरपंच निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे. मालगुंड ग्रामपंचायतमध्ये ६ सदस्य ठाकरे गटाची शिवसेना तर ५ शिंदे गटाचे सदस्य निवडून आले आहेत. इथे काट्याची लढाई झाली. पण सरपंच ठाकरे गटाच्या शिवसेनेचा निवडून आला आहे.
राजापूर-लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपनेते आमदार डॉ. राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत यश मिळाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार डॉ. राजन साळवी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. राजापूर विधानसभा मतदार संघातील एकूण ५३ ग्रामपंचायतींपैकी ३५ ग्रामपंचायतींवर भगवा फडकवत आपले वर्चस्व कायम राखले असा दावा साळवी यांनी केला. उर्वरित १८ ठिकाणी गावपॅनेल, कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाजपने आपल्या जागा जिंकल्या आहेत.
लोकसभा, विधानसभा, पं. स. व जि.प. च्या अनेक निवडणुकीत या २६७ राजापूर विधानसभा मतदार संघात शिवसेनेने सातत्याने आपले वर्चस्व सिद्ध करत हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे सिद्ध केले आहे. दरम्यानच्या झालेल्या ग्रा.पं.च्या निवडणुकीप्रमाणे या वेळीही शिवसेनेने गाव पॅनलसहित इतर सर्व विरोधकांना स्वतःच्या जवळपासही फिरकू न दिल्याचे पत्र ग्रामपंचायतीच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.