कोकणातील रिफायनरीला उद्धव ठाकरे गट शिवसेना यांनी कडाडून विरोध केला होता. मात्र, बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला ठाकरे गटाने आता समर्थन दिलं आहे. राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सुमारे २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला तेल शुद्धिकरण प्रकल्प आता नाणारऐवजी बारसू जि.रत्नागिरी येथे होणार आहे. मंगळवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याबाबत शिक्कामोर्तब झाले आहेत.
नाणार आणि पंचक्रोशीतीली नागरिक तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या विरोधामुळे अनेक वर्षे तेल शुद्धिकरण प्रकल्प रखडला होता. मात्र, राज्य सरकार हा प्रकल्प कोकणातच करण्यावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तेल शुद्धिकरण प्रकल्पासाठी बारसूची जागा निश्चित केली असून, प्रकल्पाला चालना देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटानेही या प्रकल्पाला समर्थन दिलं आहे.
रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेनेने भूमिका बदलल्याने पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. तर काही ठिकाणी नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला जात आहे. यावरून, आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघातून मतदारांची संख्या कमी होतेय. येथील तरुण वर्ग नोकरीच्या निमित्ताने मुंबई-पुणे, कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. हे स्थलांतर थांबवण्यासाठी रिफायनरी प्रकल्प राजापुरात होणं गरजेचं आहे, असं राजन साळवी म्हणाले. तसंच, रिफायनरीसारख्या महाकाय प्रकल्पामुळे कोकणातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे असंही राजन साळवी म्हणाले. त्यांनी हे स्पष्टीकरण ट्विट करून दिले आहे.
रिफायनरीसारखा प्रकल्प कोकणात झाल्यास येथे लाखो तरुणांना रोजगार व अनेक कुटुंबांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील व राजापूर तालुक्यातील नोकऱ्यांचा अनुशेष भरून निघण्यास मदत होईल. या महाकाय प्रकल्पामुळे राजापूर तालुक्यातून कायमस्वरूपी होणारे स्थलांतर थांबेल अशी मला खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.