रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी अनधिकृतपणे बांधण्यात येत असलेल्या अनेक बांधकामांची चर्चा अनेक दिवस सुरु आहे. सीआरझेड तसेच मेरीटाईम बोर्ड, महसूल विभाग इत्यादी संबंधित विभागांची परवानगी न घेता अनेकजण खाडी, समुद्राच्या किनाऱ्यालगत बांधकामाला सुरुवात करताना दिसत आहेत. शासनाने आखून दिलेल्या नियमावली धाब्यावर बसवून अशी बांधकामे केली जात आहेत.
परंतु, आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अधिक प्रमाणात समुद्रकिनारी आणि खाडी लगतच्या भागामध्ये अतिक्रमणे वाढू लागल्याने अशा अवैध्य बांधकामांवर मेरीटाईम बोर्ड अतिक्रमण काढण्यासाठी नोटीसा पाठवणार आहे. मागील आठवड्यामध्ये राजिवडा येथे करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल तक्रार दिली असता, त्यावर त्वरित कारवाई करून उभारलेले अवैध्य बांधकाम त्वरित काढण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडून राजिवडा जेटीनजीक अनेकानी बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांना नोटीसा पाठविण्यापासून श्रीगणेशा करण्यात आला आहे. त्यातील काहींची बांधकामे पूर्ण झाली असून, काहींची बांधकामे अर्धवट झालेली आहेत. विना परवानगी बांधकाम पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड रत्नागिरीचे बंदर निरीक्षकांनी अशांना नोटीसा पाठविल्या आहेत. आणि संबंधितांवर अधिनियम १९०८ च्या कलम ४ (३) आणि कलम १० तसेच महाराष्ट्र सागरी मंडळ अधिनियम १९९६ च्या कलम ३५ अन्वये उल्लंघन झाल्याप्रकरणी या नोटीसा बजावल्या गेल्या असून, त्वरित केलेले अनधिकृत बांधकाम काढण्यात यावे अशा सूचना दिल्या आहेत.
रत्नागिरीतील अशा समुद्रकिनारच्या सर्व अनधिकृत बांधकामांवर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडून एका पाठोपाठ एक धडक कारवाई करण्यात येणार असून, अशा सर्व बांधकामांवर हातोडा फिरवण्यात येणार असल्याचे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना सूचित करण्यात आलेले आहे.