रत्नागिरीमध्ये पावसाळ्याचे ३-४ महिने मासेमारी पूर्णत: बंद असते. एकतर माश्यांचा प्रजननाचा हा काळ असतो आणि पावसाच्या माऱ्यामुळे, वाऱ्याच्या वेगामुळे, समुद्रातील भरती ओहोटीमुळे नौकेची स्थिती सुद्धा खराब होऊ शकते त्यामुळे या काळात मासेमारीवर बंदी घालण्यात येते. तरी सुद्धा काही मासेमारी करायला समुद्रात बोटी घेऊन गेलेले आढळतात.
त्यामुळे त्याचा परिणाम परवानाधारक मच्छिमार्यांवर होतो. समुद्रातील हि अवैध मासेमारी रोखण्यासाठी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी एक नामी युक्ती काढली आहे. मासेमारीवर असणाऱ्या बंदीमुळे आता सर्व मच्छीमार नौका बंदरांमध्ये, जेटींवर उभ्या आहेत. या नौकांच्या नावांची आणि त्यांचे नंबर नोंदवून घेऊन ते कार्यालयातील विविध परवान्यांच्या नोंदींमध्ये तपासले जाणार आहे. ज्या नौकांचे नाव आणि नंबर नोंदी तिथे नसतील अशा नौकांवर कारवाई केली जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला १६७ कि.मी. चा विशाल समुद्रकिनारा लाभला आहे. या किनार्यांवर ४६ ठिकाणी बंदर, जेटी आहेत जिथे मासे उतरवण्याचे काम सुरु असते. त्याचप्रमाणे जिल्ह्यात एकूण ३ हजार ५१९ मच्छीमार नौका असून त्यातील ३०७७ यांत्रिकी नौका तर ४४२ बिगर यांत्रिकी नौका आहेत. या अधिकृत नौकां व्यतिरिक्त इतर अनधिकृत नौका किती आहेत, याचा शोध घेण्यासाठी आणि अवैध मासेमारीवर रोख लावण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने सध्या बंदरावर उभ्या असलेल्या नौकांचे नाव आणि नंबर नोंदवून घ्यायची युक्ती शोधली आहे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी सर्व परवाना अधिकार्यांना सूचना देऊन बंदर आणि जेटींवर उभ्या असलेल्या मच्छीमार नौकांची नावे आणि नंबर बाबत माहिती संकलीत करावयास सांगितले आहे.