तालुक्यातील राज्य संरक्षित स्मारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपाळगडावरील अवैध बांधकामे अखेर आज जमीनदोस्त करण्यात आली. २ एप्रिल २०२५ रोजी बांधकामे पडणार हे निश्चित झाले होते. मात्र, प्रत्यक्षात कारवाई होत नव्हती. अखेर पुरातत्त्वने किल्ल्यावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगडावर जागा मालकाने २०१४ मध्ये अनधिकृत बांधकाम केले होते. हे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची अंतिम सूचना साहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयाने १७ मार्च २०२५ ला सुफिया युनूस मणियार व कादिर हुसेन मणियार यांना दिली होती.
या नोटिसीवर म्हणणे मांडण्यासाठी २ एप्रिल २०२५ पर्यंतची मुदत दिली होती. परंतु, कोणतेच म्हणणे सादर झाले नाही. त्यामुळे किल्ल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याचा मार्ग मोकळा झाला होता. शनिवारी (ता. २४) रत्नागिरी पुरातत्त्व विभागाचे साहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली किल्ल्यातील सर्व अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एक पोलिस अधिकारी व तीन पोलिस तैनात करण्यात आले होते. तहसीलदार परिक्षित पाटील यांच्यासह मंडल अधिकारी, तलाठी हेदेखील उपस्थित होते.