पावसाळ्यात वाऱ्याच्या वाढत्या वेगासोबतच वादळात होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटना यापूर्वी मुंबई, पुणे या महानगरांमध्ये घडल्या आहेत. या घटनांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा नाहक बळी जातो. याची गंभीर दखल राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मॉन्सूनपूर्व आढावा बैठकीत सामंत यांनी जिल्ह्यातील सर्व अनधिकृत, धोकादायक होर्डिंग काढण्याचे आदेश दिले होते. चिपळूणनंतर रत्नागिरी पालिकेने होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू केली आहे. रत्नागिरी पालिकेने केलेल्या पाहणीत शहरात एकूण १९० अधिकृत होर्डिंग आहेत. त्यातील डबल असलेली २० होर्डिंग धोकादायक असल्याचे निश्चित झाले आहे, तर ४० होर्डिंग अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले होते. सोमवारपासून रत्नागिरी पालिकेने अनधिकृत, धोकादायक होर्डिंग काढण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
दोन दिवसात ४० अनधिकृत होर्डिंग हटवण्यात आली आहेत तर अधिकृत असलेल्या एकूण १९० पैकी २० होर्डिंग काढण्यात येणार आहेत. त्यापैकी ८ होर्डिंग काढण्यात आली आहेत. शहरातील मारुती मंदिर, माळनाका, जयस्तंभ येथे ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. मोठ्या क्रेनच्या साहाय्याने होर्डिंग उतरवली जात आहेत. पालिका मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या आदेशाने ही कारवाई केली जात आहे.
कारवाईत सातत्य ठेवा – अनधिकृत आणि धोकादायक असलेल्या होर्डिंग्जवर रत्नागिरी पालिकेने कारवाईची भूमिका घेतली आहे. त्यामुळे संभाव्य धोके टाळले जाणार असून, शहराचे होणारे विद्रुपीकरण ही थांबणार आहे. पालिकेने या कारवाईत सातत्य ठेवावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.