कोकण म्हटलं की नजरेसमोर येतात ती आंबा, काजूच्या बागा, नारळी, पोफळीची वाडी, निसर्गसंपन्न गाव आणि स्वच्छ विस्तृत समुद्रकिनारा आणि मासेमारी. यामुळे, सुट्टी म्हटली की अनेक पर्यटक हे कोकणात दाखल होतात. यामुळे या गावांना त्यांचा दर्जा मिळवून देत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी UNWTO म्हणजेच युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन मार्फत त्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. यासाठी ठराविक निकषांच्या आधारे या गावांना मूल्यांकन करत या गावांना सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून ओळख निर्माण करता येणार आहे.
कोकण हे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले निसर्गाने संपन्न असलेले गाव. यामध्ये, कोकणातील पश्चिम किनारपट्टीवर असलेले रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड येथील अथांग समुद्रकिनारे, ऐतिहासिक गडकिल्ले हे कोकणाचे विशेष आकर्षण आहे. किल्ले रायगड हे जगभरातील शिवप्रेमींचे श्रद्धास्थान आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी आहे. तर, महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे, श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर, मुरूड येथील जंजिरा किल्ला यांची वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे. तर, रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेले मुरुड, श्रीवर्धन, जंजिरा, अलिबाग हि स्थळे समुद्र पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. अगदी अवघ्या एक ते दोन दिवसाची सुट्टी घालवण्यासाठी देखील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. या तालुक्यातील पर्यटन व्यवसायावर आधारित अनेक उद्योगधंद्यांना याचा आर्थिक नफा होत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथील सुवर्ण गणेश मंदिर आणि थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान हे तिथे असलेल्या मिनीट्रेनमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. तसेच पेण तालुक्यातून जगभरात हजारो गणपती मूर्त्या पाठविला जात असल्याने पेण तालुक्याची विशेष अशी ओळख निर्माण झाली आहे. यामुळे, कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या गावांना त्यांची ओळख निर्माण करण्याची संधी या योजनेमार्फत मिळणार आहे. त्यामध्ये ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची युएनडब्ल्यूटीओच्या सल्लागार मंडळामार्फत मूल्यांकन केले जाणार आहे. आपल्या गावाचे नाव जागतिक पातळीवर मिळण्यासाठी जास्तीत जास्त गावाने सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.