मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोकणातील खंदा शिलेदार, ज्यांनी राज्यात पहिल्यांदा नगरपरिषदेवर मनसेचा झेंडा फडकवला, आता तेच वैभव खडेकर नाराज असल्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरू आहेत. त्यांनी ठेवलेले व्हाट्सअप स्टेटस हाही एक चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान पक्षप्रमुख राज ठाकरेंकडे त्यांनी भेटीची वेळ मागितली आहे. पक्ष सोडणार असं आपण कधीच म्हटलं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर थेट वैभव खेडेकर यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘होय, आम्हाला पक्षात अत्यंत अपमानास्पद अशी चुकीची वागणूक मिळत आहे. मीच नाही तर असंख्य जुने पदाधिकारी कार्यकर्ते नाराज आहेत. आम्ही आमचे पक्षप्रमुख राज ठाकरेंकडे भेटीची वेळ मागितली आहे. त्यामुळे ही भेट मिळेल आणि आम्ही आमची बाजू मांडू. आम्ही आमचे दुःख साहेबांकडे व्यक्त करू’, असं सांगतानाच ते म्हणाले की ‘मी पक्ष सोडणार असं कुठेही म्हटलेलं नाही.
मला अन्य पक्षाकडून आलेल्या ऑफर हा दुसऱ्या पक्षातील नेत्यांचा मोठेपणा आहे. पण मी कधी पक्ष सोडणार, असं म्हटलेले नाही’ असंही वैभव खेडेकर जवळ बोलताना स्पष्ट केल आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांच्याकडून वैभव खेडेकर यांना भेटीची वेळ मिळणार का? नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडणार? याकडे अवघ्या कोकणाचं लक्ष लागल आहे. अलीकडे शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम, मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम व मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर हे एकाच व्यासपीठावर आले असताना वैभव खेडेकर यांच्या कामाचा कौतुक करत त्यांना शिवसेनेत पक्ष प्रवेशासाठी थेट ऑफर देण्यात आली होती. त्यानंतर दोनच दिवसात वैभव खेडेकर यांनी केलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या राज ठाकरे यांच्याकडून रद्द करण्यात आल्या त्यामुळे कोकणातील वैभव खेडेकर हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आल आहे. अशातच त्यांनी व्हाट्सअप स्टेटसवर ठेवलेल्या मेसेजमुळे या नाराजीला अधिक बळ मिळाले आहे.
‘निष्ठावंत कार्यकर्त्यांना कवडीची किंमत नसते’ हे ठेवलेलं स्टेटस त्यानंतर दुसऱ्या दिवशी ठेवलेला वाघाचा व्हिडिओ तर सोमवारी ठेवलेला कारचा व्हिडिओ व कारमधून उतरताना म्हटलेले ‘जय महाराष्ट्र’, यामुळे खेडेकर यांच्या मनात नेमकं चाललय काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांची पक्षातील खदखद व नाराजी आता लपून राहिलेली नाही. याच पार्श्वभूमीवर वैभव खेडेकर यांनी सांगितले की आम्ही पक्ष स्थापनेपासून साहेबांबरोबर आहोत. यासाठी आम्ही कोप्पाजवळ राजकीय दृष्ट्या पंगा घ्यायलाही कमी केलं नाही. त्याचा परिणाम व्यवसायावर झाला कुटुंबावर झाला. आम्ही आजवर पक्षासाठीच झिजलो मात्र राज साहेबांना कांही नेते चुकीची माहिती देत आहेत, असं म्हणत शिवाजी पार्क मित्र मंडळ हेच राज साहेबांना चुकीची माहिती देत आहेत असाही टोला खेडेकर यांनी लगावला आहे. अशातच खेडेकर यांच्याबाबत नाराजीच्या बातम्या असतानाच दापोली येथील पूर्वीचे मनसेचे जिल्हाप्रमुख संतोष उर्फ बंड्या शिर्के यांनी काँग्रेसमधून पुन्हा एकदा थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वगृही पक्षप्रवेश करून दापोली विधानसभा मतदारसंघातील आगामी राजकारणाचे संकेत दिले आहेत.
त्यामुळे या सगळ्या घडामोडी पाहता वैभव खेडेकर यांना राज ठाकरे यांच्याकडून भेटीची वेळ मिळणार का व ही भेटीची वेळ न मिळाल्यास खेडेकर कोणती भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे यांच्यावर माझा व आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पूर्ण विश्वास आहे ते आम्हाला भेटीची वेळ देतील याची पूर्ण खात्री आहे आणि यासाठी आम्ही वर्षभर वाट पाहत आहोत, अशी बोलकी प्रतिक्रिया वैभव खेडेकर यांनी दिली आहे.’ मात्र वर्षभर वाट पाहूनही त्यांना अद्याप राज साहेबांनी भेटीची वेळ दिलेली नाही त्यामुळे आता या नाराजीच्या चर्चा आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्याचा विचार करता राज ठाकरे यांच्याकडून वैभव खडेकर यांच्या नाराजीबाबत कोणती भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खेडेकर यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देणार का? यावरच वैभव खेडेकर यांची पुढची राजकी भूमिका ठरण्याची शक्यता असल्याचा राजकीय निरीक्षक व जाणकार यांचा अंदाज आहे.