आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विज्ञान प्रदर्शनाला अनन्यसाधारण महत्त्व असून मुलांमधून वैज्ञानिक दृष्टी वाढीस लागण्यासाठी चिपळूण व रत्नागिरीतील एमआयडीसीत विज्ञान भवन उभारण्याची घोषणा करताना आमदार शेखर निकम यांना तसा प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्ह्यातील माध्यमिक विभागाच्या ५१ व्या विज्ञान प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सामंत म्हणाले की, प्राथमिक शाळेपासूनच मुलांना वैज्ञानिक दृष्टीचे बाळकडू दिले व माध्यमिक स्तरावर त्याला पैलू पडण्याचे काम केले तर आजचा प्रगल्भ विद्यार्थी विविध क्षेत्रात अग्रेसर राहू शकतो. यासाठी बदलत्या काळानुसार प्रथमतः विज्ञान शिक्षकांनी हे आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी इस्त्रो, नासामध्ये सहभागी झाला पाहिजे.
त्यासाठी पूरक वातावरण निर्माण करण्याचे काम प्रतिनिधी, समाज, शाळा व पदाधिकारी यांनी करणे आवश्यक आहे. आज आधुनिक साधने विद्यार्थ्यांच्या हाती पडत आहेत. त्यामुळे पूरक वातावरण व प्रगल्भतेच्या जोरावर विद्यार्थी विविध क्षेत्रे पादाक्रांत करत आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच विमान प्रवास केला पाहिजे हे माझे स्वप्न आहे. सामंत यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी राबविलेल्या इस्रो, नासा भेट यासारख्या उपक्रमाबरोबरच इतर शैक्षणिक उपक्रमाबाबत माहिती दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रगल्भ आहे त्यांना विविध संधी प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन करत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला ३ लाख व जिल्हास्तरीयसाठी ५ लाख निधी देण्याचे अभिचन दिले.