तालुक्यातील नांदिवडे परिसरातील समुद्रकिनारी खासगी कंपनीमधून कोळसा व राखमिश्रित पाणी सोडले जात असल्याची तक्रार प्रदूषण मंडळ अधिकाऱ्यांकडे नांदिवडे ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे व्हिडिओच ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना दाखवले. गेले तीन चार दिवस पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. या परिस्थितीचा फायदा घेत जयगड परिसरातील कंपनींचें पाणी समुद्रात सोडण्यात येत आहे. येथील प्रकल्पातील कुलिंग टॉवरमधील पाणी सोडण्यासाठी समुद्रालगत पाईप टाकण्यात आले आहेत. कंपनी आवारात साठलेले पाणी गटाराद्वारे समुद्रात सोडले जात आहे. यामध्ये कोळसा व राखमिश्रित पाणी असल्याने त्याचा परिणाम समुद्रातील जलचरांवर होणार आहे.
हे पाणी जमिनीत मुरत असल्याने व वहाळामधून हे पाणी सोडले जात असल्याने आजूबाजूच्या विहिरींनाही त्याचा फटका बसत आहे, असे गावकऱ्यांनी म्हटले आहे. मोठ्या पावसाचा फायदा घेऊन दरवर्षी प्रकल्पातून कोळसा व राख मिश्रित पाणी सोडण्यात येत असल्याचा आरापेही नांदीवडे ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन नागरिकांनी माहिती दिली. संबंधित अधिकारी लवकरच याची पाहणी करणार आहेत.. दरम्यान, जलप्रदूषणाबाबत नांदीवडे ग्रामस्थ जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार करणार आहेत.