स्कायवॉकवरील व्हर्टिकल गार्डनमुळे दुरवस्थेबाबतच विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात ३५ उद्याने असून, त्यापैकी पाच ते सहा गार्डन मोठी आणि सुस्थितीत आहेत. त्यांच्या देखभाल दुरुस्तीला दरमहा सुमारे ४० लाख रुपये खर्च केले जातात; परंतु ठराविक उद्याने सोडली, तर सर्वच उद्यानांची दुर्दशा झाली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना उद्याने सुस्थितीत ठेवून त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आदेश दिले. ‘सकाळ’ने शहरातील उद्यानांची दुर्दशा या मथळ्यावर या विषयार प्रकाश टाकला होता.
पालिकेच्या सुस्तावलेल्या यंत्रणेने कोणतीही हालचाल केली नाही; परंतु पालकमंत्री सामंत यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर पालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणा जागी झाली आहे. रत्नागिरी शहरातील उद्यानांमुळे शहराच्या वैभवात भर पडली. जिजामाता उद्याने हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. त्यानंतर संसारे गार्डनदेखील कोट्यवधी रुपये खर्च करून केले होते; मात्र काही दिवसांत त्याचीही दुरवस्था झाली. पालिकेकडून याची माहिती घेतली असता शहरामध्ये पालिकेची लहान आणि मोठी ३५ उद्याने आहेत. त्यापैकी ५ उद्यानेच मोठी असून, त्यापैकी मोजकीच सुस्थितीत आहे. उर्वरित उद्यानांची देखभाल दुरुस्ती अभावी दशा झाली आहे.
खेळणी, इतर साहित्य गंजले आहे, काही पडून आहे. देखभाल न झाल्याने ही परिस्थिती आहे. पालिका शहरातील उद्यानांच्या देखभालीसाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च करते. एवढा निधी जर मिळत असेल तर उद्यानांची अशी अवस्था का, असा सवाल उपस्थित होत आहे. पालकमंत्री सामंत ते म्हणाले, ‘या गार्डनबाबत कोणतीही कल्पना मुख्याधिकाऱ्यांनी दिली नव्हती; पण नागरिकांचा विरोध असेल तर त्याचा विचार होईल.’ त्यानंतर शहरातील भकास झालेल्या उद्यानांचा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला. तेव्हा त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना ताकीद देत शहरातील उद्यानांची योग्य पद्धतीने देखभाल दुरुस्ती करा दुर्लक्ष करू नका, असे आदेश दिले.