गणोशोत्सवात कोकणात येणाऱ्या नियमित रेल्वेगाड्यांना कायम गर्दी असते. रेल्वेगाड्यांची आरक्षित तिकिटे मिळणेही कठीण होते. त्यासाठी गणेशोत्सवात विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहेत. परंतु, रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण सुरू होताच काही कालावधीत फुल्ल झाले. सध्या प्रतीक्षा यादी १,१०० वर पोहोचली आहे. कोकण रेल्वेच्या नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीने मर्यादा पार केल्याने ‘रिग्रेट’चा संदेश येत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणेच यंदाही चाकरमान्यांचा प्रवास खडतर होणार, हे निश्चित आहे. गणेशोत्सव २७ ऑगस्टला सुरू होत असून, कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १८ जुलै रोजी २५० विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची घोषणा केली त्यानंतर, २५० विशेष रेल्वेगाड्यांव्यतिरिक्त ४४ विशेष रेल्वेगाड्या आणि २ दिवा-चिपळूण मेमू अशा एकूण २९६ रेल्वेगाड्या चालवण्याचे ३० जुलैला जाहीर करण्यात आले.
तसेच अधिक सहा विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा ३१ जुलैला करण्यात आली असून, गणेशोत्सव काळात एकूण ३०२ रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजित करण्यात आले आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने २९ जुलैला मडगाव-लोकमान्य टिळक-मडगाव साप्ताहिक आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव या दोन विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा मध्यरेल्वेने केली आहे. विशेष गाडीचे तिकीट आरक्षण ५ ऑगस्टला सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले. तसेच ऑनलाइन तिकीट काढण्यासाठी प्रवासी सर्व तयारीनिशी सज्ज होते. मंगळवारी सकाळी ८ वाजता तिकीट काढण्याची वेळ सुरू झाल्यानंतर काही सेकंदात प्रतीक्षायादी ५०० वरून एक हजारावर गेली. त्यानंतर ८ वाजून १ मिनिट ३८ सेकंदात प्रतीक्षायादी १,१३७ वर पोहोचली.
रेल्वेगाड्यांची नियमित प्रतीक्षायादीची क्षमता पूर्ण झाल्याने ‘रिग्रेट’ असा संदेश आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर दिसू लागला आहे. तसेच, विशेष रेल्वेगाड्यांची प्रतीक्षायादीने हजार पार झाल्याने, प्रतीक्षायादीची मर्यादा पूर्ण झाली आहे. रेल्वेगाडीचे आरक्षित तिकीट मिळत नसल्याने कोकणात यायचे कसे, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.