गेली दोन वर्ष जिल्हा परिषदेत कोणतीही निवडणूक नाही, सर्वसाधारण सभा नाही, स्थायी नाही, आठ-आठ तास चालणारी जनरल सभा चालत नाही, पण तीही नाही. आता तुम्हीच ठराव घालणार. गेल्या दोन वर्षांत प्रशासन आल्यानंतर एकही वावगं काम झालेलं नाही, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या २८व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री सामंत बोलत होते. या कार्यक्रमासाठी सामंत यांच्यासमवेत सीईओ कीर्तीकिरण पुजार, अतिरिक्त सीईओ परिक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, डीआरडीएच्या संचालक नंदिनी घाणेकर, ग्रा. पं. विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई आदी उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, अधिकारी वा कर्मचाऱ्यांशी माझं कोणतही वैर नाही; पण तुम्ही ज्या ज्या खुर्च्यांवर बसलात त्या खुर्चीने ते काम करावे, अशी प्रामाणिक इच्छा असते; पण काही लोकांनी समजून घेणे गरजेचे असते. ती काही एक टक्के लोकं चांगले काम करणाऱ्या ९९ टक्के लोकांना बदनाम करत असतात म्हणून त्या एक टक्क्याला बाजूला करण्याची ताकद सीईओंमध्ये असावी. प्रशासन चालवताना कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले तर प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकारीही आनंदात राहतात, आनंदात काम करतात तसेच काम जिल्हा परिषदेच्या सीईओंनी करावे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत आदर्श पॅटर्न राबवला जाईल, असे कर्मचारी, अधिकारी लाभले आहेत. कर्मचाऱ्यांचे सकारात्मक पाऊल आहे. प्रशासन असतानाही कर्माचारी चांगले काम करतात, हे दाखवून दिले आहे. सीईओंनी एक कुटुंबप्रमुख म्हणून कर्मचाऱ्यांना सांभाळा.