प्रतिकूल हवामानामुळे काजूचे उत्पन्न घटल्याचे चित्र आहे. त्यातून हापूसप्रमाणे काजूच्या जमाखर्चाचा मेळ बसताना दिसत नाही. यात सुक्या काजू बियांपेक्षा ओल्या काजूगरांना काहीसा जादा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी व बागायतदारांकडून सुक्या काजू बियांपेक्षा ओले काजूगर विक्री करण्याकडे कल वाढला आहे. चविष्ट अन् पौष्टिक असलेल्या ओल्या काजूगरांचा दर चांगलाच वधारला आहे. सद्यःस्थितीमध्ये प्रतिकिलो आठशे हजार रुपयांपासून बाराशे रुपयांपर्यंत काजूगराला दर मिळत आहे. त्यातून, काजूचे अर्थकारण बदलत चालल्याचे चित्र आहे. दिल्ली, बेंगलोरसह राज्यात मागणी वाढली आहे.
गेल्या काही वर्षामध्ये ओसाड असलेले माळरान रोजगार हमी योजना आणि फळबाग लागवडीच्या माध्यमातून ओलिताखाली आले आहे. त्यामुळे काजूच्या बागा विकसित झाल्या आहेत. मात्र, प्रतिकूल हवामानासह विविध कारणांमुळे उत्पन्नासह काजू बियांच्या विक्रीदरामध्ये कमालीचा चढ- उतार दिसत आहे. त्यातून, जमाखर्चाचा मेळ बिघडत चालला आहे. सुक्या काजूबियांपेक्षा ओल्या काजूगरांना मागणी आणि जादा दर मिळत आहे. शेतकरी आणि बागायतदारांकडून ओले काजूगर विक्री करण्याला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.
चविष्ट, रूचकर असलेल्या ओल्या काजूगरांना मुंबई, पुणे या मोठ्या शहरांसह दिल्ली, बंगळूर आदी राज्यांमध्ये मागणी असल्याचे काही शेतकऱ्यांनी माहिती दिली. सुक्या काजू बियांच्या खरेदीचा दर किरकोळ असताना ओल्या काजूगरांना आठशे एक हजार रुपयांपासून थेट बाराशे रुपये प्रतिकिलो दराने विक्री होताना दिसत आहे. ओल्या काजूगरांना मिळणारा जादा भाव आणि वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांकडून ओले काजूगर विक्रीकडे अधिक कल आहे.
म्हणून ओल्या गरांना जास्त किंमत – सुक्या काजू बीच्या एक किलोमध्ये सरासरी ६०० ते ९०० बिया बसतात. एका सुक्या काजू बीची किंमत सरासरी ९० ते १२० पैसे ठरताना दिसते. दुसऱ्या बाजूला ओल्या काजूंचा विचार करता साधारणतः २८० ते ३६० ओली काजू बी फोडल्यानंतर एक किलो ओले काजूगर मिळतात. ओल्या काजूगराला मिळणाऱ्या दराचा विचार करता एका काजूगराला सरासरी २ ते ४ रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे सुक्या काजूबियांच्या दरापेक्षा ओल्या काजूगरांना दर मिळत आहे.