‘आता तुमचा योगेशदादा मंत्रालयात बसला आहे, अगदी मुख्यमंत्र्यांच्या शेजारीच माझे दालन आहे. मला फक्त मुख्यमंत्र्यांकडे जाऊन विकासकाम ांसाठी निधी आणायचा आहे आणि ते काम मी करणार आहे’ असे सांगत गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी विकासकामांचे वचन शिवसैनिकांसह नागरिकांना दिले आहे. शिवसेनेचे युवा ‘नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोली मतदारसंघातील एका कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच एकत्र लढवल्या जातील असे स्पष्ट संकेत दिले आहेत. दापोली मतदारसंघात दापोली तालुक्यातील दाभोळ बंदरातील जेट्टीच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
विजयात संघाचा सिंहाचा वाटा – यावेळी उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक ना. योगेश कदम यांनी केले. ज्यांनी काम केलं नाही त्यांचा हिशोब होईल असे सांगत महायुतीचं काम न करणाऱ्या काही भाजप पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले आहेत. यावेळी त्यांनी संघाचे जाहीरपणे कौतुक केले आहे. मला आवर्जून सांगावं लागेल की, या विधानसभा निवडणुकीत माझ्या मतदारसंघात मिळालेलं मोठं मताधिक्य आणि महाराष्ट्रातही महायुतीला मिळालेलं मोठं यश, या सगळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असं सांगत संघाची प्रचार यंत्रणा आणि कार्यपद्धती याचं कौतुक गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं आहे.
त्यांचा रिपोर्ट गेला आहे – ना. योगेश कदम पुढे म्हणाले की, योगेश कदमही शब्दाला जागणारा आहे, ही शिकवण आम्हाला रामदासभाईंनी दिली आहे. शब्द दिला की तो पाळायचा. १००% युतीचे पालन केले जाईल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण एकत्रच लढू, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही युतीचे पालन करून लढवल्या जातील, यामध्ये कोणतीही व कोणीही शंका बाळगण्याचं कारण नाही. पण तिथे देखील सगळं तोलून मापून, सगळी मोजणी होणारच आहे, कोणी काम केले, कोणी काम नाही केले, या सगळ्याचा रिपोर्ट मी द्यायच्या अगोदरच आपल्या पक्षामार्फत वरती पोहोचलेला आहे असं सांगत उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांचे कामाचे कौतुक केले. यावेळी ज्यांनी विधानसभेला महायुतीच्या विरोधात काम केलं, त्यांचा रिपोर्ट भाजपच्या व महायुतीच्या नेत्यांकडे गेला आहे. वरती जो काही संदेश द्यायचां तो गेला आहे, असे जाहीर सुतोवाच करत योगेश कदम यांनी विरोधी काम केलेल्यांना सुनावले आहे. आता तुमचा योगेश दादा मंत्रालयात बसला आहे आणि माझं दालनही सहाव्या मजल्यावरच आहे.
मुख्यमंत्रीही त्याच मजल्यावर आहेत, मला फक्त मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन निधी आणायचा, आहे. आता मी मतदारसंघातील प्रत्येक विभागाचा विकास आराखडा तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आणि तीन महिने लागू देत, नाहीतर सहा महिने लागू देत, पण मी मतदारसंघांतील प्रत्येक गावात जाऊन मतदारांचे आभार मानणार आहे. मी आता मंत्री झालो म्हणून तुम्हाला काही लोक सांगतील की आता तुमचा आमदार महाराष्ट्रात संभाजीनगर, नांदेड, कोल्हापूर तिकडे फिरणार, आता तो गावात येणार नाही पण तुम्ही चिंता करू नका, तुम्ही कोणत्याही विरोधकाच ऐकू नका, मी प्रत्येक गावात पोहोचणार आहे, अशीही ग्वाही राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी दिली. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय खांडके, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, किशोर देसाई, उन्मेष राजे, प्रदीप सुर्वे, भगवान घाडगे, सुनील दळवी, रोहिणी दळवी, भाजपचे डॉ. आनंद गोंधळेकर, रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस प्रीतम रुके पदाधिकारी उपस्थित होते.